ऑनलाईन टीम / मुंबई :
मार्चच्या सुरुवातीलाच राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे नैऋत्य बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन पुढील 36 तासात तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता आहे. परिणामी विकेंडनंतर दोन दिवस कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 07 मार्च रोजी पालघर, पुणे आणि नगर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. नंदुरबार, धुळे, नाशिक, बुलाढाणा, औरंगाबाद आणि जळगाव या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील. यानंतर मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या अवकाळी पावसाचा पिकाला फटका बसू शकतो. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी सारख्या पिकांना अवकाळीचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी काढणी पूर्ण केली असल्यास त्यांनी आपली पिके झाकून ठेवावी, असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.