परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेतल्यानंतर राज्यात पुन्हा ईडीचा खेळ सुरू होण्याची चिन्हे आहेत. ईडी त्यांना जबाबाला कधी पाचारण करते याकडे आता लक्ष असेल.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जबाबात कलगीतुरा दिसून येत होताच. पण आता परमबीर सिंग यांनी पवित्रा बदलत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी आपल्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता, असे सांगितल्याने याला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. वाझे हा गुह्यांची माहिती थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देत होता, ब्रिफिंगही तोच द्यायचा, वरि÷ अधिकाऱयांना आणि मलाही तोच ब्रिफिंग करायचा अशी माहिती सिंग यांनी आपल्या अलीकडच्या प्रतिज्ञापत्रात दिली असल्याचे उघडकीस आले आहे. आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या गृहमंत्री कार्यालयातच ठरत. काही वेळा अनिल देशमुख यांच्याप्रमाणे अनिल परब हेही नावे सांगायचे असे सिंग यांनी म्हटले आहे.
दरम्यान, त्याकाळात गृह सचिव असलेले आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेल्या सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख आपले वरि÷ असल्याने त्यांनी बदल्यांबाबत दिलेला आदेश मी पोहोचवायचो शिवाय मुंबईतील ज्या साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयांच्या बदल्याबाबत वाद निर्माण झाला त्या बदल्या रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले होते. ते आपण परमबीर सिंग यांना दिल्याचा जबाब दिला आहे. या दोन्ही जबाबनंतर राज्यात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी समोर दिलेला जबाबही पुढे आला आहे. त्यात परमबीर सिंह हे अंबानी यांचे घर अँटिलिया येथे स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणाचे मास्टर माईंड आहेत. सिंग आपल्यापासून माहिती लपवत होते, असा आरोप देशमुखांनी केला आहे. सचिन वाझेला सेवेत परत कोणी घेतलं याची मला माहिती नाही. तो अधिकार पोलीस आयुक्तांचा आहे. सचिन वाझे याला मी एकटा कधीच भेटलो नाही. फक्त एका प्रकरणात विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याचवेळी मी त्याला माझ्या बंगल्यावर बोलावलं होतं, असा जबाब नोंदवून देशमुख यांनी परमबीर सिंग यांनीच वाझे याला खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते आणि त्याची माहिती आपण आपल्या पुढील जबाबात देऊ असे सांगितले आहे.
देशमुख आणि सिंग यांनी एकमेकावर असे आरोप प्रत्यारोप चालवले असले तरी त्यात ठाकरेंचे नाव प्रथमच गोवले गेले. त्यामुळे त्यांच्या बाजूने काही प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा होती. जी खासदार संजय राऊत यांनी दिली. परमबीर सिंग हे स्वतः एक आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीपासून अपहरणापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या आरोपांचा काहीच उपयोग नाही असे सांगतानाच आपणही अशा एखाद्या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव घेऊ शकतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव अशा पद्धतीने घेतले जायचे असे म्हणणे राऊत यांनी मांडले. अनिल परब यांनीही याप्रकरणात आपणास संबंधित यंत्रणा जेव्हा विचारणा करेल तेव्हा आपण आपली बाजू त्यांच्यापुढे मांडू असे सांगत अधिक बोलणे टाळले आहे. विरोधी पक्षाने याबाबतीत भांडवल करणे हे त्यांचे वैफल्य आहे असे आदित्य ठाकरे बोलले आहेत. त्यामुळे सत्तापक्षाची किंवा शिवसेनेची या प्रकरणातील भूमिका काय असेल हेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही परमबीर सिंग हेच मास्टरमाइंड असल्याचा पत्रकार परिषद घेऊन आरोप केला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि बाजू या मंचावर मांडणे वेगळे आहे. मात्र या प्रकरणात ईडी कोणाला, कधी चौकशीला बोलवणार त्याबाबत कोणताही खुलासा ईडीकडून झालेला नाही. त्यामुळे ही चौकशी पुढे कोणत्या मुहूर्तावर चालू होणार याबाबत उत्सुकता असेल. ईडीच्या कारवाईला नेहमीच सत्ता डळमळीत करण्यासाठी केंद्र सरकारकडून होणारा वापर अशा अंगानेच घेतले जाते. नेमके मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही चौकशी सुरु केली जाणार का? हा खरा प्रश्न आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडी शरद पवार यांना चौकशीला बोलावणार अशी हवा उठली आणि त्याचा भाजपकडून गवगवा होत असतानाच चौकशीला हजर होण्याचा पवारांनी पवित्रा घेतला आणि राज्यात राष्ट्रवादीच्या बाजुने वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ठाकरेंच्या चौकशीला ईडी कोणता मुहूर्त काढते आणि इतर कोणकोणत्या यंत्रणा त्यात हस्तक्षेप करणार, त्याला महाविकास आघाडीकडून कसा प्रतिसाद मिळणार, ठाकरे सरकार आपल्या अधिकारातील भाजप नेत्यांची प्रकरणे याच वेळी उकरुन काढणार की चौकशी सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले जाणार याची उत्सुकता असणार आहे. गेली दोन वर्षे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात अशाच कारवाया करत आल्याने यापेक्षा काही वेगळे घडणे मुश्कीलच.
ठाकरेंच्या भेटीला केसीआर!
देशात 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असून देशातील नेतृत्वात गुणात्मक बदल होण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी भाजप विरोधात देशपातळीवर आघाडी उघडण्यासाठी अधिक वेगाने काम करायला हवे या मुद्यावर दोघांचे एकमत झाले आहे. लवकरच आपण मुंबईत जाऊन ठाकरे यांची भेट घेऊ असे केसीआर यांनी बुधवारी दिल्लीत जाहीर केले. केंद्र सरकारच्या गैरभाजपशासित राज्यांच्या विरोधातील धोरणाला विरोध म्हणून एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या महिन्यात ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती. केसीआर हे पुढचा टप्पा म्हणून महाराष्ट्रात येत आहेत. ईडीचा खेळ आणि विरोधकांचा मेळ एकाचवेळी सुरु होण्याची ही चिन्हे आहेत.
शिवराज काटकर