अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली, अनेक ठिकाणी झाडांची पडझड
प्रतिनिधी/ पणजी
पावसाने पुन्हा एकदा राज्याला झोडपून काढले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, घरांची पडझड, नदी-नाल्यांची पुरसदृश स्थिती त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.
पावसाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ात कहरच केला. गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. मान्सून सक्रिय असून पावसाचे वातावरण आणखी असेच राहिल. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा पणजी वेधशाळेने दिला. सध्या पावसाचा जोर बराच वाढलेला आहे. रात्रभर राज्यात सर्वत्र पाऊस कोसळत होता तर दिवसभरात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. परिणामी अनेक नव्या दुथडी वाहू लागल्या. सांखळीच्या व डिचोलीच्या वाळवंटी नदीच्या पाण्याचा स्तर बराच वाढला. सांखळीत वाळवंटीमध्ये 4 मीटर पेक्षाही पाण्याचा स्तर वाढला. पूर येऊ नये म्हणून सांखळी बाजारातील पंपहाऊस चालू करून पुराचे पाणी वाळवंटीत सोडण्यात आले.
राज्यात अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले व मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने अडकून पडली. मुसळधार पावसाने राज्यातील जनजीवन विस्कळीत केले.
पणजीत 3.5 इंच
गेल्या 24 तासात पणजीत 3.5 इंच तर पेडणेमध्ये 4 इंच पावसाची नोंद झाली. सांखळी, केपेमध्ये प्रत्येकी 3 इंच, मुरगावात 3 इंच पाऊस झाला. आगामी 24 तासात जोरदार वादळी वाऱयासह पाऊस पडेल. समुद्रातील लाटा 3 ते 4 मीटर उंचावर जातील. वाऱयाचा वेग ताशी 50 ते 60 कि.मी.पर्यंत जाऊ शकतो. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, अशा इशारा वेधशाळेने दिला. राज्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱयाने राज्यातील अनेकांचे नुकसान झाले. कित्येक ठिकाणी वृक्ष कोसळले. काही झाडे घरांवर कोसळल्याने घरांचीही ऐन पावसात नुकसानी झाली. अग्निशामक दलाच्या जवानांना सकाळपासून बरेच काम पडले. कित्येक रस्त्यांवर पडलेले वृक्ष कापून रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे अग्निशामक दलांच्या जवानांना भाग पडले.