सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन
प्रतिनिधी/ पणजी
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनेही दिवाळी उत्सवातील फटाके फोडण्यावर मर्यादा घातल्या आहेत. गोव्यात 14 रोजी म्हणजे दिवाळीच्या पहाटे 4.30 ते 5.30 या दरम्यान म्हणजेच नरकारसूर दहनाच्यावेळी तसेच सायं. 7 ते 8 या दरम्यान फटाके वाजविण्यास मूभा दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील दिवाळी उत्सवावर संकट आलेले होते. हळूहळू कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालल्याने आता दिवाळी यावर्षी मोठय़ा उत्सवात होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, या उत्सवावर सरकारने टाच लावली आहे. अर्थात राज्य सरकारने दिवाळी दिनी म्हणजेच दि. 14 रोजी पहाटे 1 तास व सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी 1 तास असे दोन तास फटाके उडविण्यास मूभा दिली आहे. यामुळे यंदाच्या दिवाळी उत्सवावरील उत्साहावर आता विरजण पडल्यास जमा आहे.
पाडवा, भाऊबीजेलाही दोन तासच फटाके
गोवा सरकारच्या पर्यावरण खात्याने या संदर्भातील आदेश सोमवारी जारी केला आहे. दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजन आहे. सायं. 7 ते 8 या दरम्यान केवळ 1 तासातच फटाके लावून घेता येतील त्यानंतर वा तत्पुर्वी कोणालाही फटाके उडविता येणार नाही. त्याचबरोबर दि. 15 आणि 16 पाडवा, भाऊबीज या दिनी सायं. 8 ते रात्री 10 या दरम्यान दोन तासांतच फटाके उडविता येतील, तशी दोन तासांची मूभाही देण्यात आलेली आहे.
या आदेशातही सरकारने पोलिसांना सतर्क केले आहे आणि जे कोणी या आदेशाचे उल्लंघन करतील त्या भागातील संबंधित डय़ुटीवर असणारे पोलीस अधिकारी जबाबदार ठरले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे व पोलिसांनी फटाके उडविण्याच्या प्रकारावर लक्ष ठेवावे, असे सरकारने म्हटले आहे.
बाजारपेठांमध्ये लगबग, गजबजाट : उत्साह संचारला
दरम्यान, चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिव्यांच्या उत्सवाची तयारी जोर धरीत आहे. राज्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. जनतेमध्ये दिवाळीनिमित्त कमालीचा उत्साह संचारलेला आहे. गणेश चतुर्थी उत्सवात जेवढा उत्साह होता परंतु, त्यावर अनेक बंधने होती. त्या तुलनेत आता फार काही बंधने राहिलेली नाहीत व जनतेत त्यामुळेच चतुर्थीचा दबून राहिलेला उत्साह आता दिवाळीत भरून निघेल. राज्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त पोहे, फटाके, रंगीबेरंगी पारंपरिक आकाशकंदिल, मिठाई, फळफळावळे, सुका मेवा, रंगीबेरंगी पणत्या वगैरे विक्रीस उपलब्ध झालेले आहेत. त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी करण्यास प्रारंभ केलेला आहे.
सोमवारी राज्यातील बाजारांमध्ये घरगुती सामान खरेदीसाठी ग्राहकांनी बरीच गर्दी केली होती. मुलांना सुट्टीच असल्याने बहुतांश मुले नरकासूर प्रतिमा तयार करण्यात दंग असल्याचे आढळून आले. राज्यात यावर्षी बहुतेक ठिकाणी नरकासूर स्पर्धा रद्द झालेल्या असल्यातरी नरकासूर प्रतिमांच्या संख्या कमी झालेली नाही. उलटपक्षी अनेक ठिकाणी नरकासूर प्रतिमा तयार करण्यात युवावर्ग दंग असल्याचे दिसून येते.
शुक्रवारी रात्री म्हणजेच दि. 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी नरकासूर प्रतिमा तयार करून दि. 14 रोजी पहाटे दहन करण्यात येईल व दिवाळी उत्सवाला प्रारंभ होईल.