मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन, 52 व्या आंचिमचे दिमाखदार उद्घाटन
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात फिल्म सिटी व्हावी हे आमचे स्वप्न असून ते सत्यात येण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी सहकार्य करावे. चित्रपट निर्मितीसाठीचे सर्व कौशल्य गोमंतकीयांमध्ये आहे. त्याला अधिक बळ देण्यासाठी फिल्म इन्स्टिटय़ूट उभारण्याचे प्रयत्न आहेत. हे प्रकल्प पीपीपी तत्वावर उभारल्यास गोवा त्यात योगदान देण्यास तयार असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. हे स्वप्न सत्यात आल्यास आम्ही मनोरंजन क्षेत्रातही स्वयंपूर्ण बनू, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भव्य लखलखता रंगमंच, नयनरम्य सजावट, धुंद संगीताच्या तालावर शेकडो कलाकारांची दिलखेचक अदाकारी, ड्रीमगर्ल हेमा मालिनी, सलमान खान, रणबीर सिंग, श्रद्धा कपूर यांच्या सारखे दिग्गज कलाकार, जगभरातील विविध देशांमधून आलेले सिने निर्माते यांची उपस्थिती आणि धो-धो कोसळणारा पाऊस यांच्या साक्षीने भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शनिवारी शानदार उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरूगन, मुख्य सचिव परिमल राय, माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्र, गीतकार प्रसून जोशी, लौकीक चटर्जी, ड्रीमगर्ल हेमा मालिनी, रवी कोटारकर, मधूर भंडारकर, मंजू व्होरा, खुशबू सुंदर, ए के वीर, झी एटंरटेनमेंटचे अमित गोयंका आदी मान्यवरांची उपस्थिती होती. चित्रपट महोत्सव संचालनालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
निर्मात्यांनी गोव्याकडे यावे
पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी, गोवा हे कायमस्वरुपी ‘फिल्म शूटिंग डेस्टिनेशन’ व्हावे यासाठी राज्यात शूटिंगसाठी एक खिडकी मान्यता देण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त निर्मात्यांनी गोव्याकडे यावे, असे आवाहन केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणारा यंदाचा आंचिम सोहळा गोव्यासाठी भूषणावह आहे. पर्यटनातील तीन सी म्हणजेच ‘सन, सँड, सी’ साठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गोव्याला इफ्फीमुळे नवी जागतिक ओळख प्राप्त झाली, असेही ते म्हणाले.
पर्यटनासाठी गोवा सुरक्षित
कोरोना लसीचा पहिला डोस 100 टक्के लोकांना देणारे गोवा हे पहिले राज्य असून दुसऱया डोसचीही लवकरच 100 टक्के कार्यवाही होईल. त्यामुळे पर्यटनासाठी गोवा आता सुरक्षित राज्य बनले असून लोकांनी कोणतीही भीती न बाळगता गोव्यात यावे, अशा शब्दात डॉ. सावंत यांनी पर्यटकांना आश्वस्त केले.
96 देशांमधून सुमारे 624 प्रवेशिका
अपूर्व चंद्र यांनी आपल्या भाषणात चित्रपट महोत्सवाचा इतिहास आणि पुढील नऊ दिवसांच्या कार्यक्रमांसंबंधी माहिती दिली. 1952 मध्ये प्रारंभ झालेला देशातील सर्वात मोठा आणि सर्वात अप्रतिम असा हा महोत्सव आहे. कोरोना महामारीच्या आव्हानाचा सामना करतानाही आंचिमने आपली पुढील वाटचाल कायम ठेवली आहे. यंदा प्रथमच हायब्रिड पद्धत स्वीकारण्यात आली असली तरीही महोत्सव पूर्वीपेक्षा मोठा असेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 96 देशांमधून सुमारे 624 प्रवेशिका आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
75 प्रतिभावान युवकांचा गौरव
सोहळ्यात नंतर सिनेतारका हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना ‘फिल्म पर्सनालिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने तर मार्टिन स्कोर्सिस, इस्तवान साज्बो यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय ज्युरी मंडळातील सदस्य तसेच चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलेल्या देशातील 75 प्रतिभावान युवकांचाही गौरव करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यास उपस्थित अन्य मान्यवरांमध्ये उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मंत्री दीपक पाऊसकर, सुभाष फळदेसाई, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, आमदार, आंतरराष्ट्रीय ज्युरी, निर्माते यांचा समावेश होता.
एल. मुरुगन, अनुराग ठाकूर, राज्यपाल श्री. पिल्लई, चैतन्य प्रसाद आदींनीही विचार मांडले. मनिष पॉल आणि यांनी मनभावक सूत्रसंचालन केले.
आंचिमस्थळी छायापत्रकारांची निदर्शने
दरम्यान, गत 17 वर्षांपासून आंचिमचे चित्रांकन करणाऱया राज्यातील फोटो पत्रकारांना यंदा उद्घाटन कार्यक्रमास प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सर्व छायापत्रकारांनी शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर आपापले पॅमेरे जमिनीवर उलटे ठेऊन अनोखे आंदोलन केले. त्यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा महोत्सव गोव्यात होत असूनही गोमंतकीय पत्रकारांना तेथे प्रवेश दिला जात नाही हा संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रावरच अन्याय आहे. हा सोहळा म्हणजे आम्हा पत्रकारांसाठी एक भावनिक क्षण असतो. या आठ दिवसात आम्ही आमची खासगी कामे सुद्धा बाजूला ठेवत असतो. अशावेळी आंचिमचे उद्घाटन छायांकन करण्याचे हक्क खासगी कंपनीस देणे म्हणजे आमचे हक्क सरकारने हिरावून घेतल्यासारखेच आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया गोवा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी व्यक्त केली.
क्षणचित्रे
(1) ‘कसो आसा गोवा’ अशा कोकणी शब्दातून सूत्रसंचालक मनिष पॉल यांनी गोमंतकीयांची खुशाली विचारली.
(2) ’आझादी के 75 सालोंको सिने सलाम’ म्हणत सूत्रसंचालक करण जोहर यांनी आंचिमला अनोखी मानवंदना दिली.
(3) दोन्ही सूत्रसंचालकांनी एकमेकांना हस्तांदोलन करत ’हाऊ इज द जोश’ असे शब्द उच्चारले तेव्हा उपस्थितांना माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही.
(4) भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तर गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव अशा अपूर्व योगावर यंदाचा आंचिम साजरा होत आहे. (5) आंचिम गोव्यात सुरू करणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे यावेळी स्मरण करण्यात आले.