मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी /बेंगळूर
पुढील सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात 130 हून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा संकल्प केला आव्हान आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व तऱहेचे प्रयत्न करणार आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे.
बुधवारी राजभवन येथे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यपालांच्या डोळय़ाचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे विचारपूस करण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली आहे, असे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात 130 हून अधिक जागा मिळवून भाजपला सत्तेवर आणण्याचा आपण संकल्प केला आहे. आतापासूनच त्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात येतील. पुढील दोन वर्षातही चांगल्या पद्धतीने कामे करणार असल्याचे आश्वासन राज्यातील जनता आणि भाजप कार्यकर्त्यांना देत आहे. 10-12 जिल्हय़ांचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचेही ते म्हणाले.