पुणे/ प्रतिनिधी
राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील २४ तास महत्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, त्याचा प्रभाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान देशात सध्या दोन कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय असल्याने देशाच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात उत्तर पश्चिम तसेच लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत याची तीव्रता वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पश्चिम उत्तर पश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत किनारपट्टी पार करणार आहे. ओरिसा तसेच उत्तर छत्तीसगडला यामुळे पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय पूर्व राजस्थान तसेच लगतच्या भागातही आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या प्रभावामुळे संपूर्ण देशभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी महाराष्ट्राच्या भागात जोरदार पाऊस होत असून, पुढील पाच दिवस पाऊस कायम राहणार आहे. काही भागत मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगलीत दोन दिवस मुसळधार
पुढील दोन दिवस पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा व सांगलीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच मुंबई, सिंधुदुर्ग, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागात वादळी व जोरदार पाऊस होणार आहे.