पुणे / प्रतिनिधी
कोकण-गोव्यासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारी व रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मागच्या 24 तासांत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणासह राज्याच्या विविध भागांना पावसाने जोरदार तडाखा दिला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. सक्रिय मान्सून तसेच कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर आहे. पहिल्या टप्प्यात पावसापासून वंचित राहिलेल्या मराठवाडा, विदर्भ व खान्देश टापूत सध्या चांगला पाऊस होताना दिसत आहे. मागच्या 24 तासांत औरंगाबादमध्ये तब्बल 127.5 मिमी पावसाची नोंद झाली. परभणीत 62.2, जळगावात 47, अकोला 15.1, नाशिक 24.1, नागपूर 27, कोल्हापूर 23.1, रत्नागिरी 59.2, मुंबईत 38, तर पुण्यात 1.9 मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व कोकणात चांगला पाऊस होत असल्याचे चित्र आहे. तुलनेत मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे.
सध्या कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेशच्या भागावर असून, पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. यात गुरुवारी नाशिक, नंदुरबार तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जोरदार पाऊस राहणार आहे, शुक्रवारी रायगड, रत्नागिरीला जोरदार आणि शनिवारी, रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, तर रायगड ठाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार
कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतच्या भागावर आहे. हे क्षेत्र पश्चिम उत्तर पश्चिमेच्या दिशेने प्रवास करणार आहे. याशिवाय येत्या शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे.