निर्बंधित क्षेत्रात सूट नाही : मास्क, सामाजिक अंतर राखणे सक्तीचे : प्रवासी वाहतूक, मद्यविक्री बंदच
प्रतिनिधी / बेंगळूर
जीवघेण्या कोरानामुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. साधारण महिनाभरापासून लॉकडाऊनचे पालन करीत असलेल्या राज्यातील जनतेला आता दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने बुधवारी मध्यरात्रीपासूनच लॉकडाऊन अंशतः शिथिल करण्याची घोषणा केली आहे. मात्र ही सूट कोरोनाचे रुग्ण असणाऱया निर्बंधित प्रदेशात (कंटेन्मेंट झोन) राहणार नाही.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी रविवारी राज्यात सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याची घोषणा केली होती. मात्र, जनतेतून विरोध झाल्यामुळे त्याच दिवशी रात्री त्यांनी आदेश मागे घेतला होता. मागील तीन दिवसांत इतर राज्यांच्या तुलनेक कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्ण कमी आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गसूचीप्रमाणे राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण मास्क आणि सामाजिक अंतर राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल करताना संबंधित जिल्हा प्रशासनांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या मार्गसूचीप्रमाणे लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला तरी जिल्हा पातळीवर नियम शिथिल केले जाणार आहे. आंतरजिल्हा संचार, सार्वजनिक वाहतूक (प्रवासी वाहतूक) बंद राहणार आहे. हॉटेल, धाबा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी केवळ खाद्यपदार्थ पार्सल देण्याची व्यवस्था असेल. मेडिकल, आरोग्य सेवा, दूधविक्री, बँका, कृषी उत्पादनविक्री, एपीएमसी, वृत्तपत्रे वाटप यापूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून वाहन दुरुस्ती गॅरेज, किराणा दुकाने, मांसविक्री, केबल, डीटीएच सेवा, बांधकाम क्षेत्राशी संबंधित दुकाने आणि व्यवसाय देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसऱया जिल्हय़ात जाण्यासाठी विशेष पास मात्र आवश्यक राहणार आहे.
कृषी आणि मत्स्योद्योगासाठी यापूर्वी देण्यात आलेली सूट यापुढेही राहणार आहे. खत-बियाणे पुरवठय़ासाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. केवळ ग्रामीण भागात रस्ते निर्माण कार्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियना देखील कामे करण्यास मुभा देण्यात आली आहे.
धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध
विमानसेवा, मेट्रो रेल्वे, बस प्रवासी सेवा, शाळा-महाविद्यालये 3 मे पर्यंत बंद राहणार आहेत. मुख्य म्हणजे आयटी-बीटी क्षेत्राला (माहिती आणि जैविक तंत्रज्ञान) कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. ऑटो रिक्षा, कॅब-टॅक्सी, चित्रपटगृहे, मॉल, मद्यविक्रीही बंद राहणार आहे. धार्मिक सभा-समारंभ, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात एकत्र येण्यावरील निर्बंधही 3 मे पर्यंत यथःस्थिती राहणार आहे.