आज सर्वपक्षीय बैठकीनंतर होणार घोषणा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातही कोरोनाने थैमान घातले असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियम जारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नियमांसंबंधी मंगळवारी सायंकाळी नवी मार्गसूची जारी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन जारी होणार की नाईट कर्फ्यू याकडे जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
महाराष्ट्र, नवी दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांनी कोरोना नियंत्रणासाठी कठोर नियम जारी केले आहेत. आता राज्यातील तीन मतदारसंघांमध्ये मतदान झाले असून मंगळवारी राज्यपाल वजुभाई वाला आणि मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर येडियुराप्पा राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कोणत्या प्रकारचे नियम जारी करावेत, यासंबंधी निर्णय घेतील. त्यानंतरच अधिकृत मार्गसूची जारी केली जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी दिली आहे.
सध्या राज्यातील बेंगळूर, धारवाडसह आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू जारी आहे. आता संपूर्ण राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत नाईट कर्फ्यू जारी करून लोकांच्या अनावश्यक संचारावर प्रतिबंध घालण्यात येण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल, शाळा-महाविद्यालयांच्या बाबतीतही नियम आणखी कठोर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी सरकारकडून जारी होणाऱया मार्गसूचीकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी मंगळवार दि. 20 एप्रिल रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून राज्यपाल वजुभाई वाला हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी 4.30 वाजता बैठक होणार आहे. कोरोनाची बाधा झाल्याने येडियुराप्पा मणिपाल इस्पितळातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, विधानपरिषदेचे विरोधी नेते एस. आर. पाटील, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, निजद प्रदेशाध्यक्ष एच. के. कुमारस्वामी, आमदार डॉ. जी. परमेश्वर, एच. डी. रेवण्णा आदी सहभागी होण्याची शक्यता आहे.
बनावट मार्गसूचीमुळे गोंधळ
राज्यात 3 मे पर्यंत रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आल्यासंबंधीचे बनावट पत्रक सोमवारी रात्री व्हायरल झाले. त्यामुळे शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. याविषयी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. व्हायरल झालेली मार्गसूची बनावट असून मंगळवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. सरकारने कोणत्याही प्रकारची मार्गसूची जारी केलेली नाही. काही समाजकंटकांनी जुन्या मार्गसूचीमधील तारीख बदलून ती व्हायरल केली आहे. याविषयी तपास करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोट्स…..
विरोधी पक्षांकडून लॉकडाऊनला विरोध
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करू नये. लॉकडाऊनऐवजी कठोर नियम जारी करण्याबरोबरच इस्पितळांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्सची कमतरता भासू नये याकडे लक्ष पुरविण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी होणाऱया सर्वपक्षीय बैठकीत सोमवारी विरोधी पक्षातील नेत्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांवरही चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
– आर. अशोक, महसूलमंत्री