मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी : शेजारी राज्यांतील कोरोना परिस्थितीची भीती : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद
प्रतिनिधी / पणजी
कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून गोवा राज्यातील लॉकडाऊन 3 मे नंतरही वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केली आहे.
पर्वरी येथील सचिवालयातून डॉ. सावंत यांनी मोदींशी संवाद साधला. पंतप्रधानांनी सोमवारी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून प्रत्येक राज्याची सध्यस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांच्याकडून सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने वरील मागणी केली.
शेजारील राज्यांतील परिस्थितीची भीती
गोवा शेजारील राज्यात म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने गोव्यासाठी लॉकडाऊनची मुदत वाढवणे आवश्यक आहे. या मुतदवाढीसाठी राज्य सरकारतर्फे एक पत्र केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे. गोव्याच्या सर्व सीमा बंद ठेवण्यात येणार असून रेल्वे, विमान, सार्वजनिक बस वाहतूकही राज्य व आंतरराज्य स्थगितच राहणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी मोदींशी बोलताना नमूद केले.
तीन एप्रिलनंतर एकही कोरोना रुग्ण नाही
गोव्यात 3 एप्रिलनंतर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेला नाही. तत्पूर्वी जे सात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते त्यांचे अहवाल निगेटिव्ह येऊन ते आता पूर्णपणे बरे झालेत. आताच्या घडीला गोवा कोरोनामुक्त असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी मोदींना दिली.
आर्थिक व्यवहार व उपक्रम मात्र चालूच राहतील
राज्यातील आर्थिक व्यवहार व उपक्रम मात्र चालूच राहतील, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्याशी वार्तालाप करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांची उपस्थिती होती.
गोमंतकीय खलाशांच्या विलगीकरण खर्चाचा मुद्दा
गोव्यात परतणाऱया खलाशांना विलगीकरण कक्षात (कोरोन्टाईन) ठेवल्यानंतर त्याचे शुल्क आकारू नये, अशी मागणी त्यांच्या कुटुबियांनी केली आहे. खलाशांच्या कल्याण निधीतून सरकारला प्रति महिना ठराविक रक्कम देण्यात येते. त्यामुळे त्यांच्यासाठी पैसे घेण्यात येऊ नयेत, असे कुटुंबियांचे म्हणणे असून ते त्यांनी अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांना भेटून सांगितले आहे.
गोव्यात कोरोनाविषयी औषधांचा दुसऱयांदा पुरवठा
सुमारे 714 कि. ग्रामची विविध प्रकारची औषधे उडान लाईफटाईम विमानातून गोवा राज्याला पुरवण्यात आली आहेत. गोव्यासाठी देण्यात आलेला हा दुसऱया टप्प्यातील औषध पुरवठा आहे.
जाहीर सभा, मेळावे, बैठकांवर बंदी कायम
जाहीर सभा, मेळावे, बैठका यावर बंदी कायम असून त्यात कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. राज्यातील खाणी चालू करण्यासाठी एमएमडीआर कायद्यात दुरुस्तीची मागणी एका निवेदनातून पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेतून दिली.
पास असणाऱयांना वाहनांना कोणीही अडवू नये
कर्नाटकातून काही वाहने गोव्यात येतात. खनिजमाल तसेच जीवनावश्यक वस्तू, साहित्य घेऊन येणाऱया वाहनांना अनुमती देण्यात आली असून त्यांना कोणी अडवू नये. ती वाहने गोव्यात येऊन माल खाली करतात व परत जातात. त्यांना पास देण्यात आले आहेत, असा खुलासा डॉ. सावंत यांनी केला.
गावातील, शहरातील मार्केट, बाजारपेठा, मॉल हे सर्व वगळून पालिका क्षेत्रातील मालाची, भाजी पाल्याची दुकाने काल सोमवारपासून उघडण्यात आली आहेत. काही ठिकाणी गर्दी तर अनेक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून कामकाज सुरू झाल्याचे दिसून आले. सलून, स्पा, हॉटेल्स हे सर्व बंदच ठेवण्यात येणार असून गरजेची जीवनावश्यक सेवेची दुकाने खुली ठेवून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचे सांगितले.
साडेसहा हजार पर्यटकांना पोहोचविले मायदेशी
गोव्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर राज्यात अडकून पडलेल्या विविध देशातील पर्यटकांना एकूण 33 विमानातून परदेशात पाठवण्यात आले. त्यांची संख्या 6416 एवढी असून लहान मुलांची संख्या 58 होती. युके, रशिया, एएसए, इस्रायल, फ्रान्स, इटली, स्पेन, पोलंड, कझाकिस्तान, फिनलंड, बेलारूस, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशात त्यांची रवानगी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
66 खलाशी आज गोव्यात : मंत्री श्रीपादभाऊ
गेले अनेक दिवस बोटीवर अडकून पडलेल्या आणि मुंबईत दाखल झालेल्या सुमारे 66 गोमंतकीय खलाशांना गोव्यात आणण्यासाठी दोन भाडय़ाच्या बसगाडय़ा निश्चित करण्यात आल्या असून त्यातून ते खलाशी आज मंगळवारी गोव्यात पोहोचतील, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक व मुख्य सचिव परिमल राय यांनी दिली आहे. सर्व खलाशांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.