प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात वीज, पाणी आणि दूध दरवाढीचा प्रश्नच उद्भवत नाही. दरवाढीचा प्रस्ताव सरकारपुढे नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे राज्यातील जनतेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
बेंगळूरमधील आर. टी. नगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. वीज, पाणी आणि दूध दर वाढविण्याचा प्रस्ताव सरकारसमोर नाही. कोणताही पक्ष सत्तेवर असताना सरकारकडे दरवाढीचे प्रस्ताव येणे साहजिकच आहे. दरवाढीबाबत आपल्या सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही. सर्व बाजूंनी विचार करण्यात येईल, असे सांगून त्यांनी कोरोना संकटकाळात दरवाढ नसल्याचे सांगून सरकारची सद्यस्थितीची भूमिका स्पष्ट केली.
शुक्रवारीच ऊर्जामंत्री के. सुनीलकुमार यांनी राज्यात ऊर्जा खात्यातील योजना राबविण्यासाठी वीज दरवाढ अनिवार्य असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्ष आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दूध दरात 2 रुपयांनी वाढ करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितल्याचे सांगितले होते. वीज, दूध दरवाढीबरोबरच बेंगळूर महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपुरवठय़ाच्या दरातही वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सध्यातरी दरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले.