हवामान खात्याची माहिती : समुद्रात न जाण्याचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
आगामी 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून ऐन चतुर्थीदिनी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी देखील राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा दिला आहे. बंगालच्या खाडित व ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
शनिवार रात्रभर कोसळलेल्या पावसानंतर काणकोणमध्ये पावसाचा जोर थोडा ओसरला. सोमवारी सकाळीपर्यंत केवळ अर्धा इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे नद्यांची पातळी पूर्ववत झाली. पणजीत सकाळी सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर दुपारी व सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. हवामान खात्याने दिवसभरात अर्धाइंच पावसाची नोंद झाल्याचे कळविले आहे.
सोमवारी राज्यभरात सर्वत्र पाऊस
गेल्या 24 तासात म्हापसा येथे 1 इंच, पेडणे अर्धा इंच, फोंडा 1 इंच, पणजी पाऊण इंच, सांखळी 1 इंच, वाळपई 1 इंच, दाबोळी, मडगाव येथे प्रत्येकी अर्धाइंच, मुरगाव 1 इंच, केपे आणि सांगे येथे प्रत्येकी पाऊण इंच पावसाची नोंद झाली. गेले 4 दिवस राज्यात सर्वत्र पडत असलेल्या जोरदार पावसाने पुन्हा एकदा वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
पावसाबरोबरच वादळी वाऱयाचा वेगही वाढणार असून तो ताशी 40 ते 55 कि. मी. या प्रमाणे जाईल. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा पुन्हा एकदा इशारा हवामान खात्याने दिला.