वार्ताहर / राजापूर
राज्यात सत्तेसाठी महाविकास आघाडी करणाऱया तीनही पक्षांची नेते मंडळी स्थानिक ग्रामपंचायत निवडणुका मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन लढा असे सांगत नाहीत. कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण सत्ता भोगायची आणि त्यांना मात्र आपापसात झुंजवायचे, असा हा प्रकार आहे. त्यामुळे आता सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षविरहीत गावपॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढवून वरीष्ठ नेत्यांना आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लाड यांनी केले आहे.
राज्यात आघाडी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतही आघाडी होईल, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर ज्या ग्रामपंचायतीवर ज्या पक्षाचे वर्चस्व आहे तो पक्ष अन्य पक्षांना सामावून घेण्यास तयार नाही. त्यामुळे राज्यात सेना व दोन्ही काँग्रेस एकत्र असूनही ग्रामपंचायत निवडणुकीत या तीनही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात आहेत. सर्व पक्षाचे वरीष्ठ नेते स्वार्थासाठी राज्यात एकत्र येतात मात्र कार्यकर्त्यांसाठी दोन पावले मागे घेऊ शकत नाहीत.
तीनही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले असते तर ग्रामपंचायतींमध्येही आघाडी झाली असती. मात्र स्वतः एकत्र यायचं आणि कार्यकर्त्यांना आपापसात झुंजवायचं असा हा प्रकार आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे होतात, त्या कार्यकर्त्यांशी नंतर काही देणे-घेणे नसल्यासारखेच नेतेमंडळी वागत असते. पक्ष कार्यकर्त्यांनीही ही खेळी समजून आपापसात न भांडता ग्रामपंचायत निवडणूकीत एकत्र येत निवडणूका लढवाव्यात, असे आवाहन लाड यांनी केले आहे.