मोसमातील एकूण 71 इंच पाऊस : रविवारी दिवसभर जोरदार पाऊस,रस्ते पाण्याखाली, आज रेड अलर्ट जारी
प्रतिनिधी /पणजी
राज्यात गेल्या सप्ताहात विक्रमी पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस 71 इंचावर पोहोचला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस जास्त असून येत्या गुरुवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. रविवारी संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढले. पणजीत सकाळी 8.30 ते सायं. 5.10 या दरम्यान 4.5 इंच पावसाची नोंद झाली. आजही मुसळधार पाऊस पडणार असा इशारा देऊन हवामान खात्याने रेड ऍलर्ट जारी केला आहे.
रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आणि दिवसभर सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. पणजी 4.5 इंच, पेडणे 3 इंच, जुने गोवे 5.5 इंच, मुरगांव 6 इंच, काणकाणे 3.5 इंच एवढी पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. गोव्यात दिवसभरात मुसळधार पावासाने झोडपून काढलेले आहे. मोसमात आतापर्यंत एकूण 71 इंच पाऊस झालेला आहे. रविवारी संपूर्ण दिवस कोसळलेला पाऊस गृहित धरता तो 75 इंचापर्यंत पोहोचलेला आहे. पेडणे येथे सर्वाधिक 102 इंच पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे.
राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिह्यात पावसाने जोर धरला असून गेल्या सप्ताहापासून पावसाची संततधार चालू आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत कायम राहाणार आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. राज्यातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले असून उमाळे फुटले आहेत. अनेक रस्त्यांना रविवारी तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. या पावसामुळे राज्यातील सर्व रस्त्यांची दैना झाली आहे.
राजधानी पणजीतील रस्ते पाण्याखाली
संततधार, मुसळधार पावसामुळे रविवारी राजधानी पणजीतील अनेक रस्ते पाण्यात बुडाले तर अनेक भागात पाणी साचून जनतेला त्रास सहन करावा लागला. रविवारी अर्थात सुटीचा दिवस असल्याने लोकांनी जोरदार पावसामुळे घरातच राहाणे पसंत केले आणि अनेकांना सुटी असल्याने जनजीवनावर तसा फारसा परिणाम झाला नाही.
पणजी बसस्थानक, मिरामार सर्कल व शहरातील अनेक भागात पाणी तुंबल्याचे पहायला मिळाले. त्यातून चारचाकी वाहने वाट काढताना दोन्ही बाजुनी पाण्याचे फवारे उडत होते. कदंब परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ा काही प्रमाणात चालू होत्या तर बहुतेक खासगी बसगाडय़ा बंद होत्या. पावसाने तसेच पाणी तुंबल्यामुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले असून स्मार्ट सिटी म्हणवून घेणारी पणजी नगरी मांडवीला ओहोटी असल्यामुळे बुडण्यापासून वाचली. जर भरती असती तर पणजीचे अनेक भाग पाण्याखाली गेले असते. या पावसाने पणजी शहर पाणी तुंबण्यासाठी किती स्मार्ट आहे ते दाखवून दिले आहे.