संचारबंदी संपुष्टात येणार : 7 जूनपासून काही प्रमाणात शिथिलतेची चिन्हे प्रमुख बाजारपेठा खुली होण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
राज्यात तिसऱया टप्प्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी उद्या रविवारी 6 जून रोजी संपणार असून सोमवार 7 जूनपासून ती बंदी काही प्रमाणात अनलॉक (शिथिल) होण्याची चिन्हे दिसत असून तसे संकेत मिळाले आहेत. गोव्यातील कोरोना संसर्ग व बळी यांचे प्रमाण बरेच कमी झाले असून एकंदरित स्थिती नियंत्रणात आल्याने सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने खुली होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात 9 मेपासून पहिल्या टप्प्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती 23 मे रोजी संपुष्टात आल्यानंतर दुसऱया टप्प्यात ती बंदी 7-8 दिवसांनी 31 मेपर्यंत वाढवण्यात आली. मग पुन्हा एकदा तिसऱया टप्प्यात त्या बंदीत एका आठवडय़ाने 6 जूनपर्यंत वाढ करण्यात आली. पहिल्या टप्प्यात संचारबंदीचा फारसा प्रभाव दिसला नाही. परंतु दुसऱया व तिसऱया टप्प्यात कोरोनाचा संसर्ग आणि बळी कमी झाल्याचे समोर आले आहे.
या एकंदरित पार्श्वभूमीचा विचार करून राज्य सरकारने सरकारी कार्यालये 100 टक्के उपस्थितीने सुरू केली. शिवाय आता सोमवारपासून शाळा-कॉलेज व विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनाही पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार 7 जूनपासून राज्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यास मान्यता देण्यात येईल, असा अंदाज आहे. काही ठरावीक निर्बंध ठेवण्यात येतील तथापि दुकाने दुपारऐवजी सायंकाळपर्यंत खुली ठेवण्यास अनुमती मिळेल. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा सुरू होतील, अशी लक्षणे दिसत आहेत.