अधिसूचना जारी, 61 दिवस राहणार बंदी : रापण, मानशीवर अवलंबून रहावे लागणार
प्रतिनिधी / पणजी
येत्या 1 जूनपासून गोव्यात मासेमारी बंदीचा काळ सुरू होणार असून तो 31 जुलैपर्यंत चालणार आहे. मच्छीमारी खात्याच्या संचालिका शर्मिला मोंतेरो यांनी त्या बंदीची अधिसूचना जारी केली असून एकूण 61 दिवस सदर बंदी राहणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
जून आणि जुलै असे दोन महिने सदर मासेमारी बंदी कायम राहणार असून त्यावेळी इतर राज्यातील मासळीची गोव्यात मोठय़ा प्रमाणात आवक होते तसेच मासळीचे दर गगनाला भिडतात. त्यामुळे लोक मासळीऐवजी चिकन, मटण, अंडी तसेच सुकी मासळी यावर भर देतात आणि ताजी मासळी मिळेपर्यंत दोन महिने कसेबसे काढतात. अनेकजण शाकाहाराकडे वळतात. या बंदीच्या काळात गोव्यातील समुद्रात इतर राज्यातील ट्रॉलर्स, होडय़ा घेऊन त्यांनी मासेमारी करू नये, म्हणून गस्त घातली जाणार असून तटरक्षक दलाची मदत घेण्यात येणार आहे. सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील बहुतेक भागातील प्रमुख मासळी मार्केट संचारबंदी लावल्याने बंद आहेत. ती बंदी 31 मे पर्यंत लागू करण्यात आल्यामुळे 1 जूनपासून ताजी मासळी मिळणेही दुरापास्त बनणार आहे. कारण त्याच दिवसापासून मासेमारी बंदी लागू होणार आहे. बंदीच्या काळात कोणालाही मासेमारी करता येणार नाही. जे कोणी मासेमारी करतील त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असून त्यांचे मासेमारीसाठी वापरलेले ट्रॉलर्स किंवा होडय़ा जप्त करण्याचा इशारा मच्छीमारी खात्याने दिला आहे.