तीन दिवसांच्या लॉकडाऊनने साधले काय?
प्रतिनिधी / म्हापसा
राज्यातील कोरोना बिधितांची संख्या कमी व्हावी, संसर्ग कमी व्हावा यासाठी सरकारने राज्यात तीन दिवस लॉकडाऊनची घोषणा करून लॉकडाऊन केले. असे करून सरकारने काय साध्य केले असा प्रश्न राष्ट्रवादी कॉग्रेसचे गोवा सरचिटणीस संजय बर्डे यांनी केला असून हे लॉकडाऊन पाळी- उसगाव येथील मायनिंगची तस्करी करण्यासाठी केले होते का? असा प्रश्न म्हापसा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राज्यात निदान पंधरा दिवस तरी कायमस्वरुपी लॉकडाऊन त्वरित होणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी संजय बर्डे यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर त्यांच्यासोबत समाजसेवक अनिल केरकर, बलभीम मालवणकर, रियाज शेख, सितेश मोरे उपस्थित होते.
पुढे बोलताना बर्डे म्हणाले की, सरकारने कोविडच्या नवावाखाली जनतेला लुबाडण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सरकारने पाळी उसकई येथील मायनिंगची तस्करी करण्यासाठी तीन दिवस लॉकडाऊन करून येथील वाहतूक चालू ठेवून पूर्ण खनिज उचलण्याचा प्रयत्न केला होता. येथील प्रकार जनतेच्या लक्षात येताच सांखळी, बिचोली आणि इतर ठिकाणी लोकांनी लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवण्यात आलेली खनिज ट्रक अडवून सरकारचा डाव हाणून पाडला. अशामुळेच हा लॉकडाऊन केला होता की काय? असा प्रश्न येथील जनतेने सरकारला विचारला असल्याचे बर्डे म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारे राज्यपालांशी खोटे बोलत होते. प्रसार माध्यमांना खोटारडे करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यपालांनी प्रसार माध्यमांवर विश्वास असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची कानउघडणी करून प्रसार माध्यमांचे अभिनंदन केले. सरकारला कोरोना संकट हे जनतेच्या जिवापेक्षाही पैसा मोठा वाटत आहे. त्यासाठी ते येथील जनतेची गैर करीत नाहीत. राज्य सरकार पैसा नाही म्हणून सांगत आहे मात्र केंद्र सरकारकडून आणि कर्जाच्या रुपाने घेतलेला पैसा जातो कोठे? याचा हिशोब देत नाहीत. सरकारने ही भोंदुगिरी थांबवावी आणि राज्यासाठी आलेला पैसा गेला कुठे याची माहिती जनतेला द्यावी. राज्य सरकार आठ दिवस, तीन दिवस लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे न करता सरकारने किमान चौदा ते पंधरा दिवस लॉकडाऊन करून लोकांना कोरोन्टाईनमध्ये ठेवण्यापेक्षा सर्वांना घरी ठेवावे. त्यामुळे कोणाला कोरोना झाला आहे हे लक्षात यायला सरकारला विलंब लागणार नाही. यासाठी सरकारने सर्वांसाठी साधन सुविधा मोफत उपलब्ध कराव्यात.
राज्य सरकार जनतेकडे परकेपणाने वागत आहे. असे न करता सरकारने जनतेशी प्रामाणिकपणे आणि संयमाने वागावे असा सल्ला बर्डे यांनी दिला.
यावेळी बोलताना बलभीम मालवणकर म्हणाले की, सरकारने आज वाढत्या कोरोना रुग्णाची दखल घेऊन राज्यात पुन्हा त्वरित लॉकडाऊन करणे काळाजी गरज आहे जेणेकरून संसर्गाचा प्रसार होणार नाही. सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अनिल केरकर म्हणाले की, राज्यपालांनी सरकारला जबडय़ात पकडून तीन दिवस लॉकडाऊन करण्यास भाग पाडले अन्यथा हे भाजप सरकार लॉकडाऊन करण्यास राजी नव्हते. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा विचार न करता तमाम जनतेचा विचार करून राज्यात लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.