शुक्रवारी डिस्चार्जचे प्रमाण दुप्पट : दिवसभरात 401 बळी
प्रतिनिधी / बेंगळूर
लॉकडाऊन आणि क्यापक उपाययोजनांमुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत संसर्गमुक्त होवून घरी परतणाऱयांची संख्या दुप्पट आहे. दरम्यान, उपचारातील रुग्णसंख्याही कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी 22,823 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. तर याचवेळी 52,253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 401 रुग्ण दगावले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 25,46,821 कोरेना रुग्णांची नोंद झाली आहे. तर संसर्गमुक्त झालेल्यांचा एकूण आकडा 21,46,621 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 27,806 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील दोन आठवडय़ापासून राज्यात मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सरकारने ग्रामीण भागात होम आयसोलेशन पद्धत रद्द करून रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यास प्रारंभ केला आहे.
बेंगळूरमध्ये रुग्णसंख्या कमी होत असतानाच राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. शुक्रवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात 5,736, बेळगाव 1,319, हासन 1,170, म्हैसूर 1,677, शिमोगा 1,135, तुमकूर 1,326 नवे रुग्ण आढळून आले आहेत. उर्वरित जिल्हय़ांमध्ये हजारहून कमी नव्या बाधितांची नोंद झाली आहे.