बेळगावसह 7 जिल्हय़ांत वादळी पावसाची शक्यता
बेंगळूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात 23 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. बेंगळूरसह अनेक भागात रविवारी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मेजेस्टिक, राजाजीनगर, बसवेश्वरनगर, महालक्ष्मी लेआऊट, यशवंतपूर भागात पावसाची रिपरिप सुरूच होती. कोडगू जिल्हय़ातील काही भागात गारांसह पाऊस झाला आहे. परिणामी कॉफी, मिरचीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच उत्तर कर्नाटकात पावसाचे प्रमाण वाढणार असून तुमकूर, मलनाडमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे. रविवार सकाळपासूनच विविध जिल्हय़ांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कारवार, हल्ल्याळ, शिरसी, बेळगाव, धारवाड, बागलकोट, विजापूर जिल्हय़ांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी पुर्वसूचना राज्य हवामान खात्याने दिली आहे. याचबरोबर मंगळूर, उडुपी, गदग, हावेरी, गुलबर्गा, कोप्पळ, रायचूर, यादगिरी, बळ्ळारी, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, हासन, कोलार, मंडय़ा, रामनगर, म्हैसूर, शिमोगा, तुमकूर जिल्हय़ांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.