कोविड इंडिया-19 स्टडी ग्रुपचा अंदाज : 23 दिवसांत तब्बल 2 लाख 94 हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठीण निर्बंध घातले असून सार्वजनिकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी निर्बंध व नियमांचे पालन केले नाही तर 27 एप्रिलपर्यंत राज्यात दिवसाला 20 हजारांवर रुग्ण आढळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य तज्ञांच्या सहयोगाने कोविड इंडिया-19 स्टडी ग्रुपने केलेल्या अध्ययनात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. एप्रिल 27 पर्यंत दररोज 20359 तर 29 एप्रिलअखेर 25264 रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने 6 एप्रिलपर्यंत राज्यातील लोकसंख्येच्या शेकडा 33.42 टक्के चाचण्या केल्या आहेत. एप्रिल 6 रोजी राज्यात 6376 रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी राज्यातील एकूण रुग्णसंख्या 10 लाख 33 हजार 560 वर पोहोचली होती. आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. जर कठीण निर्बंध व कोरोना नियमांचे पालन न केल्यास 27 एप्रिलपर्यंत 12 लाख 58 हजार तर 29 एप्रिलअखेर 13 लाख 27 हजार 356 वर रुग्णसंख्या पोहोचणार आहे. त्यामुळे 6 ते 29 एप्रिल या 23 दिवसांत तब्बल 2 लाख 94 हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याबाबत राज्य सरकारच्या कोरोना तांत्रिक सल्ला समितीचे सदस्य डॉ. गिरीधर बाबू म्हणाले, केंद्रीय कोरोना तज्ञ पथकाच्या सहयोगाने केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, कोविड-19 स्टडी ग्रुपने वाढत्या रुग्णसंख्येबाबत अध्ययन केले आहे. खासगी व सरकारच्या सहभागाने केलेल्या अध्ययनातून राज्यात 27 एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य सरकारने कठीण निर्बंध लादून कोरोना नियंत्रणात आणला पाहिजे. तसेच जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन नको असेल तर सार्वजनिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.