सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल, बाधा होण्याची कारणे, नियंत्रणासंबंधी सूचविल्या उपाययोजना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 300 हून अधिक ब्लॅक फंगसची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याची माहिती ब्लॅक फंगससंबंधी नेमलेल्या समितीने आपल्या प्राथमिक अहवालातून दिली आहे. या रुग्णांवर जिल्हा इस्पितळांमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सोमवारी दिली आहे.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ब्लॅक फंगस कोठून येत आहे, याचा शोध घेण्यासाठी समिती नेमण्यात आली असून या समितीने प्राथमिक अहवाल दिला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स तसेच सामान्य नळाच्या पाण्याचा वापर, आयसीयु व्हेंटिलेटरचा वापर अन्य रुग्णांसाठी वापरताना, एकच मास्क दीर्घकाळ वापरणे, टय़ूब, अंथरुण आदींपासून ब्लॅक फंगस होत असल्याचे या समितीने अहवालात म्हटले आहे. तो रोखण्यासाठी उपाययोजनाही अहवालामध्ये सूचविण्यात आल्या आहेत.
कोविड इस्पितळांमध्ये बांधकामाचे नूतनीकरण करू नये, बाहेरील व्यक्ती वॉर्डमध्ये येऊ नयेत, प्रत्येक पाळी संपल्यानंतर स्वच्छता करावी, प्रत्येक उपकरण स्वच्छ असावे आणि कोरोनामुक्त झालेल्यांना इएनटी डॉक्टरांनी 3, ,7 ,21 व्या दिवशी तपासणी करावी, अशी सूचना समितीने दिल्याचे मंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
औषधांची काही प्रमाणात कमतरता
राज्यात 300 हून अधिक ब्लॅक फंगसची लागण झालेले रुग्ण आहेत. सर्व जिल्हा इस्पितळांमध्ये याची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. 17 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देखील उपचाराची व्यवस्था आहे. मात्र, औषधांची काही प्रमाणात कमतरता आहे. याबाबत केंद्रीयमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. संपूर्ण देशात वर्षाला 100 ते 200 जणांमध्ये ब्लॅक फंगस आढळून येतो. सध्या राज्यात 300 हून अधिक जणांना फंगसची लागण झाली आहे. या रुग्णांसाठी औषधांची कमतरता भासत असल्याने औषध उत्पादन वाढविण्यात आले आहे. केंद्र सरकारने 1 हजारहून अधिक ऍम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनचे वायल्स पाठवून दिले आहेत.