आजपासून दहावी परीक्षेला प्रारंभ : सर्व तयारी पूर्ण
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यभरात सोमवारपासून दहावी परीक्षेला सुरूवात होत असून शिक्षण खात्याने सर्व तयारी केली आहे. 19 व 22 जुलै रोजी होणाऱया परीक्षेसाठी राज्यात एकूण 8.76 लाख विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये 4.72 लाख मुले तर 4.3 लाख मुलींचा समावेश आहे
राज्यभरात 4,884 परीक्षा केंद्रांची स्थापना केली असून 73,066 खोलींमध्ये परीक्षा होणार आहे. दहावी परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळ आणि बीएमटीसी बसमधून मोफत प्रवासाला संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूणच दहावी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
सोमवारी समाज, विज्ञान आणि गणित विषयांची तर 22 जुलै रोजी प्रथम, द्वितीय आणि तृतीय विषयांची परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा खोल्यांचे सॅनिटायझिंग करण्यात आले आहे. प्रत्येक खोलीत 12 विद्यार्थ्यांना बसविले जाणार आहे. तसेच सर्व मुलांना मास्कचे वितरण करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये सर्व खबरदारी घेण्यात आली असून आरोग्य काऊंटर उघडण्यात आले आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करूनच परीक्षा खोली त्यांना पाठवले जाणार आहे.
ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा
विविध कारणास्तव यंदा दहावी परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची भीती दूर करण्यासाठी ऑगस्टमध्येच पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. नूतन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेनुसारच पुरवणी परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिका दिली जाणार आहे, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी सांगितले.