काँग्रेस पक्षातील काही जुन्या जाणत्या बुजुर्गांनी चार महिन्यापूर्वी टाकलेल्या ‘लेटर बाँब’ची गंभीर दखल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतली असून, काँग्रेस अंतर्गत खदखदीला सामोरे जाण्याची तयारी केली. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी पक्षातील काही असंतुष्ट नेते व निष्ठावंतांसोबत शनिवारी एक विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. सततचा पराभव व बंडखोरीमुळे गोंधळून नैराश्यग्रस्त काँग्रेसजनांच्या दृष्टीने ही सुवार्ता म्हणावी लागेल.आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला तोंड देण्यासाठी नव्या वर्षात एका सक्षम दूरदृष्टी, क्रियाशील व पक्षाला पूर्ण वेळ देणाऱया पक्ष प्रमुखाचा राज्याभिषेक व्हावा, हीच खरी इच्छा. यानिमित्ताने नेतृत्वाची कोंडी फुटावी, ज्येष्ठ व निष्ठावंत नेते कमलनाथ यांनी बैठक आयोजनासाठी पुढाकार घेतला. वास्तविक लोकसभेच्या दारूण पराभवानंतर कमलनाथ व ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणून काँग्रेसची थोडी लाज राखली होती. पण दुखावलेल्या ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या बंडखोरीमुळे कमलनाथ यांचे सत्तासन भाजपने बळकावले. सत्तेचा तोंडचा घास काढून घेतला. या सत्तानाटय़ानंतर उपरती झाल्यावर कमलनाथ यांनी सोनियांची मनधरणी केली व बैठकीसाठी मन वळवलेले दिसते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये सुरू असलेली पराभवांची मालिका, मध्य प्रदेश राजस्थानसारख्या राज्यातील बंडखोरीची लागण, पक्षनेतृत्वाचा खुजेपणा, त्याचे अपयश यामुळे आलेल्या मरगळीवरून काँग्रेसमध्ये प्रचंड खदखद सुरू असून, कपिल सिब्बल व गुलाम नबी आझाद यासारख्या निष्ठावंतांनी एका विशेष पत्राद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सततची टीका, पक्षांतर्गत कलह व असंतुष्टाची दखल घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठकीसाठी तयारी दाखवली, हे बरे झाले. राहुल गांधी यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर नेत्यांचा आक्षेप आहे. पक्षांतर्गत सुधारणेबाबत आवाज उठवण्याऱया नेत्यांमध्ये कपिल सिब्बल, पी. चिदंबरम्, शशी थरूर, गुलाम नबी आझाद यासारख्यांचा समावेश आहे. प्रदीर्घ सत्ता परंपरा असणाऱया बलाढय़ राजकीय पक्षात दीर्घकाळ सक्षम नेतृत्वाची पोकळीमुळे एकप्रकारची अस्वस्थता निर्माण होते. कशासाठी आणि कुणाकडे पाहून काम करायचे, असा प्रश्न दुसऱया-तिसऱया फळीतील कार्यकर्त्यांना पडतो. परिणामी पक्षाची बांधणी खिळखिळी होते. सव्वाशे वर्षाच्या वारसा असणाऱया व सहा दशकाहून अधिक वर्षे राज्य करणाऱया काँग्रेसची अवस्था सध्या उपरोक्त वर्णनानुसार आहे. वास्तविक कोरोना महामारी आणि नाजुक तब्येतीच्या कारणामुळे सोनिया गांधी यांनी कुणालाही भेटीची वेळ दिली नव्हती. केवळ ऑनलाईन बैठकींना त्या हजेरी लावत. परंतु आता परिस्थितीच्या दबावामुळे त्यांनी असंतुष्ट नेत्यांच्या पत्राची गंभीर दखल घेतली, हे दिसून येते. मुद्दा इतकाच की या बैठक मंथनातून समाधानकारक तोडगा मिळतो का, हे पहावे लागेल. कारण आता काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच या बैठकीतील तोडग्यावर अवलंबून असणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्ष कारभाराची दगदग झेपत नाही, या कारणास्तव सोनियांनी राहुल यांच्याकडे सूत्रे देऊन अध्यक्षपदाचा त्याग केला होता. मागील लोकसभा निवडणुकीनंतर दारूण पराभवानंतर राहुल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपद सोडले. त्यामुळे पुन्हा सोनियांना तात्पुरती सूत्रे ताब्यात घ्यावी लागली. प्रियांका यांचे नेतृत्व पक्षाच्या सरचिटणीसपदापुढे जात नाही. अशा परिस्थितीत बिगर गांधी घराण्याचा उमेदवार अध्यक्ष म्हणून या बंडखोरांना चालणार आहे काय, याचाही विचार व्हावा, आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा इतिहास असा राहिला आहे की, पक्ष नेतृत्वासाठी गांधी घराण्यातील व्यक्तीच्या नावाखेरीज अन्य नेत्यांबाबत एकमत होत नाही. नेतृत्वाची सुप्त महत्त्वाकांक्षा बाळगणारे नेते काँग्रेसमध्ये जरूर आहेत. यापूर्वीही होते. परंतु स्वतःच्या नावाशिवाय दुसऱयाच्या नावावर ते शिक्कामोर्तब करीत नाही, असा पूर्वानुभव आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे गांधी घराण्याचे नेतृत्व राहिले, हे वास्तव आहे. एका बाजूला बंडखोरांचा राहुल यांच्या पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर प्रचंड आक्षेप आहे. या परिस्थितीत त्यांच्याकडे पक्षनेतृत्वाची धुरा परत सोपवली तर पक्षातील अन्य नेते व कार्यकर्ते बंडखोरांची तळी उचलून धरतील का, याबाबत गांधी कुटुंबीय सध्या चाचपणी करीत आहेत. दुसऱया बाजूला अध्यक्षपदासाठी निष्ठावंतांपैकीच राहुल कोणाला तरी पुढे आणतील काय यावरून बंडखोरांमध्येही अस्वस्थता आहे. सारांश, सद्यस्थितीत काँग्रेस पक्ष अनिश्चितता व गोंधळाच्या भोवऱयात अडकला आहे.सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत कुठल्याही पक्षामध्ये नेतृत्व व धोरणाबाबत लवचिकता असायला हवी. तरच पक्षाचे अस्तित्व टिकेल. त्याच्या वाढीला चालना मिळेल. काँग्रेस पक्षांतर्गत घराणेशाहीचे धोरण व निर्णयाची ताठर चौकटच काँग्रेसच्या अस्तित्वाला धक्के देत आहे. एकेकाळी देशाच्या कानाकोपऱयात वस्त्यावस्त्यांमध्ये पोहोचलेला पक्ष सध्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. लोकसभेतील संख्याबळ तर एखाद्या प्रादेशिक पक्षासारखे राहिले आहे. पण ज्या पक्षाची पाळेमुळे वाडय़ावस्त्यांपर्यंत पोहोचली, असा पक्ष सहजासहजी संपत नाही, हेदेखील खरे. पक्षांतर्गत आव्हानाला दाबून ठेवत पक्षसंघटनेवर एकतंत्री वचक ठेवण्यासाठी अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्याची परंपरा नेहरू-गांधी घराण्याची आहे. कोणत्याही पक्षामध्ये व्यक्तीस्तोम हे मारक ठरू शकते. यापूर्वी लालबहाद्दूर शास्त्राr, नरसिंह राव यासारख्या काँग्रेसविरहीत नेतृत्वाने देशाचा कारभार केला आहे. नरसिंह रावांनी तर आर्थिक अरिष्टातून देशाला बाहेर काढल्याचा इतिहास आहे. लोकसभा आणि विविध राज्यांमधील निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर या पक्षाला काहीतरी राजकीय शहाणपण येईल. चुकांबाबत काही चिंतन होईल, असे वाटले होते. राहुल नाउमेद आहे तर सोनियांचा प्रकृतीशी अविश्रांत झगडा अशा अवस्थेत सध्या काँग्रेस आहे. या परिस्थितीत नेतृत्वासाठी अन्य पर्याय पुढे येतो का ते पहावे लागेल. तथापि, काँग्रेस पक्षाची दीर्घकालीन गलितगात्र अवस्था धोक्याची आहे, हे मात्र निश्चित.
Previous Articleहिवाळाः व्यायामासाठी सर्वोत्तम ऋतू
Next Article सारे जहाँ से अच्छा ! यह गोवा है हमारा !
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.