मुंबई \ ऑनलाईन टीम
रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक उर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेव्हाही काटा आला होता आणि आजही लिहितानाही येतो आहे असा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. जयंत पाटील यांनी ट्वीटरवरून आज साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एकामागोमाग एक ट्वीट करत म्हटले आहे की, आज ६ जून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी आनंदाचा दिवस. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन. याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा अरुणोदय झाला.
रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक उर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो आहे, असे जयंत पाटील यांनी दुसऱ्या ट्वीटमधून म्हटले आहे.
यासोबतच त्यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत जयंत पाटील यांनी २०१९ सालीची एक आठवण शेअर करत म्हटले आहे की, २०१९ साली जानेवारी महिन्यात परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून शिवाजी महाराजांना वंदन करून होणार होती. पक्षाच्या नेत्यांना गडावर येण्यास बराच अवधी होता म्हणून एका टुरिस्ट गाईडकडून गडाची माहिती घेतली. गाईडचं नाव आता आठवत नाही मात्र त्यांनी गडाबाबत फार सखोल माहिती दिली.
तर शेवटच्या ट्वीटमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी विनम्र अभिवादन करत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी गौरवपूर्ण क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी विनम्र अभिवादन.