ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 16 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता. 15) विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, तर मराठवाडय़ातील बहुतांश भागात किंचित घट झाल्याचे नोंदवले गेले. पुढील चार दिवस वायव्य भारतातील बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअस, तर मध्य भारतात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मालदीव आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, त्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये ढग दाटले आहेत. परिणामी विदर्भातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून मंगळवारी (ता. 15) नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्मयता आहे.