वाहतुकीला अडचण, राज्योत्सवाच्या नावाखाली पैशाचा चुराडा, नागरिकांतून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव कर्नाटकाचे आहे म्हणून दाखविण्यासाठी येथील मूठभर कन्नड संघटनेच्या हट्टापायी राज्योत्सव दिन साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर रोजी होणाऱया या राज्योत्सवासाठी सर्वसामान्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जाते. अजून राज्योत्सवाला दहा बारा दिवस बाकी असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कमान उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीमाभागामध्ये मराठी भाषिक मोठय़ा संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी सरकारी पैशातून राज्योत्सव दिन साजरा केला जातो. राज्योत्सव साजरा करण्यासाठी परजिह्यातून काही कन्नड लोकांना बोलविले जाते.
त्यानंतर बेळगावमध्ये धुडगूस घातला जातो. सरकारच्या पाठिंब्यामुळेच हे होत आले आहे. विविध ठिकाणी कमानी उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. व्यवसाय नाही, नोकऱया नाहीत. मात्र सरकार राज्योत्सवाच्या नावाखाली पैशाचा चुराडा करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सरकारी पैशातून लाल-पिवळय़ा रंगाच्या कपडय़ाची भव्य कमान उभी करण्यात येत आहे. या ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्योत्सवासाठी खर्च करण्यात येणारा पैसा सर्वसामान्य जनतेचाच आहे. राज्योत्सव साजरा करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडविल्या तर बरे होईल, अशाच प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. कोरोनामुळे विविध सणांवर बंदी घातली असली तरी राज्योत्सवासाठी कमानी उभारण्यात येत आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. काही मुठभर कन्नड कार्यकर्ते राज्योत्सव मिरवणुकीसाठी परवानगी द्या म्हणून मागणी करत आहेत. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.