प्रतिनिधी/ पणजी
राज्यात तसेच देशात कोरानाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत आहे. अशावेळी पालक तसेच विद्यार्थी घाबरल्यासारखे आहे अशावेळी अनेक पालक शाळा सुरु झाल्यावर आपल्या मुलांना शाळेत पाठवणार आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने देखील विद्यार्थ्यांसाठी यंदाचे वर्ष 2020-21 शुन्य शैक्षणिक वर्ष म्हणून जाहीर कारावे. असा सल्ला शिक्षणतज्ञ तथा गोवा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. पांडूरंग नाडकर्णी यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
पणजी येथे शनिवारी प्रोग्रेसिव्ह प्रंट ऑफ गोवा संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत पांडूरंग नाडकर्णी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे पदाधिकारी महेश म्हांबरे व ऍड. ह्दयनाथ शिरोडकर उपस्थित होते.
पालक नेहमीच मुलांच्या आरोग्याबाबत चिंतित असतात तसेच मधल्यामधेच शाळा सुरु केल्यावर गोंधळ होऊ शकतो. अशा परीस्थितीत शुन्य शैक्षणिक वर्ष जाहीर करणे योग्य ठरेल. ज्याप्रमाणे दोन महिन्याची सुट्टी असते त्याचप्रमाणे ही 12 महिन्यांची सुट्टी ठरु शकते. दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेशी जोडून ठेवण्यासाठी जसे होईल तसे ऑनलाईन वर्ग सुरु ठेवावे. असे नाडकर्णी यांनी पुढे सांगितले.
सध्या शिक्षण संस्थेमध्ये विविध तज्ञांची गरज आहे. सरकारने राज्य शिक्षण कायद्यातील कलम 24 नुसार स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावे. शिक्षण खात्याने या मंडळाकडून सल्ले घ्यावे. त्याचप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीषदेत (एससीईआरटी) सुमारे 15 विषयतज्ञांची गरज आहे. पण सध्या दोघेचजण काम करतात त्यामुळे प्रश्नमंजुषेतील, पुस्तकांमधील चूका अजून तशाच आहे. लवकरच सरकारने भविष्यासाठी बऱया शिक्षणासाठी आतापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे नाडकर्णी यांनी अधिक माहीती देताना सांगितले.