प्रतिनिधी/रत्नागिरी
सांस्कृतिक संचालनालयाने 60 व्या राज्य नाटय़ स्पर्धा आयोजनाची तारीख लांबणीवर टाकण्याच्या निर्णयात बदल करीत राज्य नाटय़च्या सर्व स्पर्धा 15 जानेवारी या निर्धारित तारखांनाच घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांना कोरोना काळात उत्सुकता असलेल्या या स्पर्धेची तिसरी घंटा घणघणणार आहे. रत्नागिरीत या हैशी मराठी राज्य नाटय़ स्पर्धेची मेजवानी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृहात रंगणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाटय़ स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी स्पर्धा आयोजनाची प्रक्रिया सुरू करून 15 डिसेंबरपर्यंत अर्ज देखील स्वीकारण्यात आले. त्यानंतर काही शासकीय प्रसारमाध्यमांद्वारे राज्य नाटय़ स्पर्धा पुढे ढकलल्या जात असल्याच्या आशयाचे मजकूर प्रसारित होणे सुरू होते. त्यामुळे त्या बाबत सांस्कृतिक संचालनालयाकडे नाटय़कर्मींकडून विचारणाही करण्यात आली. त्यामुळे ही स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे होणार की नाही, या बाबत नाटय़कर्मी व रसिकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण आता 15 जानेवारीपासून स्पर्धेस सुरुवात होणार असल्याचे सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
राज्य नाटय़ स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच कोविडविषयक सर्व नियमावलीचे पालन करून व खबरदारी घेऊन रंगकर्मींनी प्रयोगांचे सादरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाजमाध्यमावरील प्रसारित झालेल्या मजकुराच्या अनुषंगाने हे निवेदन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आले आहे. 15 जानेवारीपासून दररोज सायंकाळी 6 वाजता येथील स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृहात या स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रारंभ होणार आहे.
सादर होणारी नाटके
यामध्ये हेरिटेज कल्चर आर्ट ऍन्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी साटवलीतर्फे ‘येस माय डिअर’, 16 जानेवारी रोजी राजयोग कलामंच, मुचरी संगमेश्वरतर्फे ‘प्रतिमा एक गाणे’, 17 जानेवारी रोजी सागरदीप शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, पालशेत गुहागरतर्फे ‘थैमान’, 18 जानेवारी रोजी समर्थ रंगभूमीचे ‘लिअर जगावं की मरावं, 19 जानेवारी रोजी संकल्प कलामंच चे ‘खुराई’ ही नाटके सादर होणार आहेत. तर 23 जानेवारी रोजी श्री भैरी देव देवस्थान जांभारीतर्फे मु. पो. किन्नोर’, 24 जानेवारी रोजी श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ धामणसेतर्फे ‘नमान’ नाटय़प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिह्यात होणाऱया कार्यक्रमांना पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे आदेश आहेत. बंदिस्त सभागृहात किंवा मोकळ्य़ा जागेत लग्न समारंभासाठी त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तीच्या मर्यादेत परवानगी देण्याबाबत प्राधिकृत करण्यात येत आहे. बंदिस्त सभागृह किंवा मोकळ्य़ा जागेत इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्य, मेळावे तसेच क्रीडा संबंधित परवानगीबाबतीत त्या-त्या उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तीच्या मर्यादेत परवानगी देण्याबाबत प्राधिकृत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.