विजेत्याला मिळणार ५० हजारांचे बक्षीस
कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्य पाणी व स्वच्छता मिशनसाठी ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अभियान संचालक, आर. विमला यांनी केले आहे.
३० सप्टेंबर २०२० अखेर स्पर्धकांनी लोगो व ब्रीदवाक्य राज्यस्तरावर पाठवायचे आहे. विजेत्याला रु. ५० हजार एवढी रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. स्पर्धेच्या नियमावलीमध्ये विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये लोगो ग्रामीण पाणी पुरवठा वाणी ग्रामीण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल असा असावा, ब्रीदवाक्य मराठीतूनच असणे बंधनकारक असेल, ब्रीदवाक्य मोजक्या शब्द मर्यादेत असावे. या स्पर्धेत व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील. बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी प्रकारात असला तरी चालेल.
सहभागीने लोगोची सॉफ्ट कॉपी पाठविणे आवशक्य आहे. त्यासोबत स्पर्धकांची संपूर्ण माहिती( नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आदी) असणे आवश्यक आहे. ज्या स्पर्धकांचा लोगो अंतिम निवड होईल त्यांनी सि. डी. आर. फाईल्स उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. लोगो अंतिम करण्याचे संपूर्ण अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला असतील. स्पर्धेतील सहभागींनी लोगोची सॉफ्ट कॉपी विभागाच्या.directorwsso@gmail.com व iecwsso@gmail.com या मेलवर पाठविण्यात यावी. ज्या बोधचिन्ह आणि बोधवाक्य यांची अंतिम निवड होईल, त्यांना ५० हजार रुपये एवढी रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येईल. ३० सप्टेंबर अखेर १२ वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यातून प्रवेशिका राज्यस्तरावर पाठवायचे आहे. याबाबत शासनाचे पत्र zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
या नियमावलीप्रमाणे स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्थानिक कलाकार , शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अध्यक्ष बजरंग पाटील , उपाध्यक्ष सतीश पाटील, सीईओ अमन मित्तल यांनी केले आहे.