10 जण मंत्रिपदाची शपथ घेणार : प्रभावी खात्यांसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपमधील गोंधळ दूर झालेला नसतानाच गुरुवारी सकाळी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. बेंगळूरमधील राजभवनमध्ये होणाऱया समारंभात नूतन आमदार मंत्रिपदी शपथबद्ध होणार आहेत. पक्षात गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या 10 जणांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे माहिती मिळाली आहे.
विधानसभेच्या 15 जागांसाठी दोन महिन्यापूर्वीच पोटनिवडणूक झाली होती. त्यानंतर नूतन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून निर्माण झालेल्या गोंधळामध्ये दिवसेंदिवस भर पडली. हा गोंधळ अद्याप शमलेला नाही. पक्षातून दबाव वाढल्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त निश्चित केला आहे. अंतिम क्षणी पूर्वनियोजनात बदल करून 13 ऐवजी 10 जण गुरुवारी मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतल्याचे सुत्रांकडून समजते.
मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शपथबद्ध होणाऱया मंत्र्यांची यादी राजभवनाकडे पाठवून दिली आहे. दरम्यान भावी मंत्र्यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या डॉलर्स कॉलनीतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. प्रभावी खात्यांसाठी मुख्यमंत्र्यांवर या आमदारांनी दबाव आणली आहे. अमुक खात्याची जबाबदारी आपल्याला हवी, अशी मागणी करण्यात येत आहे.
13 ऐवजी 10 जणांना संधी
मंत्रिमंडळ विस्तारावेळी 10 नूतन आमदार आणि 3 मूळ भाजप नेत्यांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण पक्षात अनेक आमदार इच्छुक असल्याने गुरुवारी 10 जणांनाच मंत्रिमंडळात सामावून घेऊन महिनाभरानंतर पुन्हा दुसऱया टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचना करण्याबाबत भाजपश्रेष्ठी विचाराधीन आहेत. मूळ भाजप नेते असलेल्या आमदार उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी याबरोबरच नेते सी. पी. योगेश्वर यांच्यासह अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. इच्छुकांची यादी वाढतच असल्याने गोंधळात भर नको यासाठी सध्या 10 नूतन आमदारांनाच संधी देण्यात येत आहे.
…अन्यथा आमदार म्हणून काम करणार : उमेश कत्ती
मंत्रिपद मिळाल्यास राज्यातील विकासकामे करेन. अन्यथा आमदार म्हणून मतदारसंघातील विकासकामांवर लक्षे केंद्रीत करेन, अशी प्रतिक्रिया आमदार उमेश कत्ती यांनी दिली आहे. बुधवारी आमदार भवनमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. आपल्याला मंत्रिपद मिळेल याची शंभर टक्के खात्री आहे. 13 वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. आता देखील मंत्रिपद मिळाल्यास राज्यातील जनतेसाठी काम करेन. कोणतेही खाते स्वीकारण्याची आपली तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
कुमटळ्ळींना मंत्रिपद मिळण्याचा विश्वास
मुख्यमंत्री येडियुराप्पा आपल्याला मंत्रिपद देतील, असा विश्वास आमदार महेश कुमटळ्ळी यांनी व्यक्त केला आहे. येडियुराप्पा दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत. आपल्याला मंत्रिपद मिळणार नाही, अशी अफवा पसरली आहे. आपल्याला मंत्रिपद मिळणार नसेल. तर एच. विश्वनाथ आणि सी. पी. योगेश्वर यांना संधी मिळावी. योगेश्वर यांनी आपल्यासोबत राहून साथ दिली आहे. त्यामूळे त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी विनंती येडियुराप्पांकडे केल्याचे कुमटळ्ळी यांनी सांगितले आहे.