प्रतिनिधी/ म्हापसा
येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर राज्यात मंत्री मंडळात फेरबदल होणार असल्याचे ठामपणे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दै. तरुण भारतसा बोलताना दिली. मंत्री मंडळात आपल्याबरोबरच अन्य मंत्री आमदारांनी मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांना स्पष्टपणे सांगितले आहे. पर्यटन मंत्रीपद बाबू आजगावकर यांच्याकडून काढून ते दयानंद सोपटे यांना द्यावे अशी मागणीही यावेळी मंत्री लोबो यांनी केली.
पुढे बोलताना मंत्री लोबो म्हणाले की, पर्यटन मंत्रीपद आपल्याला द्यावे असे आपण म्हणत नाही. एका चांगल्या आमदाराला द्यावे. जो ऐकणारा आहे ज्याची मनस्थिती आहे. भाषण देऊन ही इंडस्ट्री कुठे पोचणार नाही. आम्ही हातात हात घालून सरकार व जनतेने पुढे जायला पाहिजे. सध्याचे पर्यटन मंत्री अडाणी आहे असे आपण म्हणत नाही. पेडणे तालुक्यात दोन जागा आहे. पेडणे आणि मांद्रे. पेडणे बरोबर नाही तर मांद्रेला द्यावी. दयानंद सोपटे पक्ष सोडून आलेला आहे, सर्वसामान्य माणूस आहे. बहुजन समाजाचा नेता. ऐकणारा व साधेपणाने वागणारा, चांगले काम करणारा. त्यांना हे मंत्रीपद द्यावे असे लोबो म्हणाले.
पर्यटनदृष्टय़ा आम्ही ग्रामीण भागात विकासाबाबत अद्याप मागे आहेत
आमदार दयानंद सोपटे, आमदार ग्लेन टिकलो हे आमदार आहेत त्यांना किनारी भागात पर्यटन विषयी काय चालले आहे याची संपूर्ण माहिती आहे. आमदार सुभाष फळदेसाई सांगून सांगून थकले आपल्या नेत्रावळी गावचा विकास साधा. आम्ही नेत्रावळीबाबत बोलताना गावातील आंतरिक भागाबाबतबी बोलणे गरजेचे आहे. मेणकुरे गाव आहे. आतमध्येही खूप चांगले गाव आहेत. तेथील पायाभूत विकास साधण्याबाबत कुणीही लक्ष दिले नाही. मुख्यमंत्र्यांचा जो खरा गाव आहे तेथेही अद्याप कुणी पोचले नाही. त्यांच्या गावातही पर्यटनदृष्टय़ा खूप काही विकसित करता येते. हरवळे धबधबा, गुहा आहेत मात्र त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. आपण म्हणेन पर्यटन आराखडय़ाबाबत अद्याप कुणी योग्यरीत्या लक्ष दिले नाही.
आर्थिक कणाच मोडून पडला
पर्यटन ही आमची इकोनॉमी आहे यावर जनता पोट भरते. हरमल ते आरोंदा काणकोण या किनारी भागात लोक काम करीत आहे. आज हॉटेल्स बंद आहे. ही इंडस्ट्रीज पुढे जायला हवी तेव्हाच खऱया अर्थाने गोव्याला आर्थिक प्राप्ती होईल. आज आर्थिक कणाच मोडून पडला आहे अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
शौचालय स्वच्छतागृहाबाबत पर्यटन मंत्र्यांना तंबी
राज्यात किनारी भागातील स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत यावर आपण आवाज उठविला होता त्याचे काय झाले असा प्रश्न लोबो यांना केला असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसमवेत आपली संयुक्त बैठकही झालेली आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरही उपस्थित होते. त्यांना याबाबतची सर्व माहिती देण्यात आली. त्यांना याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. पक्ष अध्यक्षांनीही समजावून पर्यटन मंत्र्यांना सांगितले आहे असे लोबो यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या आदेशानंतरच राज्यात खाणी सुरू होईल
केंद्रातून खाण सुरू करण्याबाबत आदेश येईल तेव्हाच राज्याचे मुख्यमंत्री खाण सुरू करण्याबाबत निर्णय घतील. केंद्रातून लिलावाचा आदेश आल्यास लिलाव, आम्ही एमआरडीसाठी अंमलबजावणी करतो म्हटल्यास अंमलबजावणी केली जाईल. खाण 2037 पर्यंत चालेल तर हेच लिलाव करणारे तोपर्यंत चालणार आहे.