प्रतिनिधी/ सांखळी
विठ्ठलापूर सांखळी येथे राज्य महामार्ग क्र. 1 हा मृत्यूचा सापळा झाला असून सा. बां. खात्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या भिषण अपघातानंतर 14 तासात त्याच ठिकाणी पहाटे 5.30 वा. मालवाहू ट्रक बाजूच्या घरावर कोसळला. दैव बलवत्तर म्हणून घरातील सर्व मंडळी वाचली. या प्रकाराने परिसरात भितीदायक वातावरण पसरले.
अगोदरच अरूंद त्यातही मोठा उत्तार, त्यातच एक वळण आणि आजूबाजुला टेकून अलेली घरे. कुठेही संरक्षक कठडा नाही, वारंवार अपघात होऊन देखीला अपघत प्रवण क्षेत्र म्हणून जाहिर झालेले नाही. अशा या महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात त्यातच कोणत्याही वाहनावर वेगनियंत्रण नसल्याने दररोज मोठमोठे अपघात होत असतात.
राज्य महामार्ग क्र. 1 हा एकमेव सांखळी-डिचोलीला जोडणारा रस्ता आहे व या महामार्गाला विठ्ठलपूर सांखळी येथे मोठय़ा उतारावर भरधाव वाहने जातात बाजुला संरक्षक भिंतही नाही वा पत्र्याचे कुंपणही नाही. रविवारी या महामार्गावर विठ्ठलापूर येथे भरधाव वेगाने आलेल्या व्हॅगन कारने एका दुचाकी वाहन चालकाला ठोकर देऊन त्याचा बळी घेतला. सदर कारमध्ये 4 माणसे होती ती सुदैवारे वाचली. हा अपघात होऊन केवळ 15 तास उलटले तोच याच ठिकाणी एक मालवाहू ट्रक पहाटे 5.30 वा. बाजूच्या घरावर कोसळला आणि या अपघाताच्या आवाजाने आजुबाजुचे नागरिक रस्त्याच्या दिशेने धावले.
मालवाहू ट्रकामध्ये प्रत्येकी 500 ते 750 किलो वजनाचे पेपरचे रिळे होते. पहाटे घडलेल्या या घटनेनंतर धुरांचे व धुळीचे लोट उसळले व वीज वाहीन्या तुटल्या त्या ट्रकमध्ये किती माणसे होती हे कळायला मार्ग नव्हता. बाजूच्या ज्या घरावर ट्रक कोसळला त्या घरातील माणसे सुदैवाने दुसऱया बाजूने झोपली होती व ती सुरक्षीत राहिली. या घटनेनंतर काही काळ वाहतूक दुसऱया छोटय़ा मार्गाने वळवली. डिचोलीहून या घटनेनंतर बऱयाच वेळानंतर पोलीस पोहोचले. अग्नीशमन दलही पोचले. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून ट्रक चालकाला सुरक्षीतपणे ट्रकमधून बाहेर काढले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेनंतर तेथे जाऊन पहाणी केली. ज्या राणू नाईक यांच्या घरावर ट्रक पडून त्यांचे बरेच मोठे नुकसान झाले त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शक्य होईल तेवढी मदतीचे आश्वासन दिले. तसेच या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचेही आश्वासन दिले.
108 गाडी एका तासाने पोहोचली.
दरम्यान या घटनेत नेमके किती जखमी झाले हे माहित नव्हते तोपर्यंत तेथील नागरिकांनी धावाधाव सुरू केली. पोलीस यंत्रणा फोनला प्रतिसाद देत नव्हते. अग्नीशामक दलाच्या संपर्क होईना व 108 वाले केरी येथे आहे पाठवू असे सांगितले. व चक्क एक तासानंतर रुग्णवाहिका आली. 108 क्रमाकांला फोन केल्यानंतर तो पुण्यात पोहोचतो व कोणत्या जिल्हय़ात घटना घडली? असा सवाल करतात. त्यातून वाहन विलंबाने येते. रविवारी पाऊण तास झाला तरी 108 वाहन केरीहून घटनास्थळी पोहोचली नव्हती. सांखळी ऐवजी केरी सत्तरी येथे 108 क्रमांकावर सेवेची रूग्णवाहिका ठेवली जाते याचे कारण समजले नाही.
सांखळी पोलीस यंत्रणा फोन घेत नव्हती अखेरीस पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांच्याशी पणजी येथे संपर्क साधला असता त्यांनी तातडीने पोलीस, अग्निशमन दल तसेच वाहतूक पोलिसांनाही पाठवून दिले. मात्र 108 क्रमांकाच्या सेवेमध्ये फार बदल करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान या अपघातात प्रवण क्षेत्राबाबत सां. बा. खात्याने त्वरित उपाय योजना हाती घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. विठ्ठलापूर हा भाग मये मतदारसंघात येतो. स्थानिकांनी स्थानिक आमदारांचे तोंड पाहून वर्ष उलटलेले आहे. त्यामुळे नागरिक मुख्यमंत्र्यांकडे सहकार्यासाठी जात असतात.