भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका : तालुक्यातील पूरग्रस्तांशी तेलींनी साधला संवाद
वार्ताहर / दोडामार्ग:
गेली दोन तीन वर्षे पुराच्या संकटाचा सामना करणाऱया कुडासे तसेच आसपासच्या पूरबाधित ग्रामस्थांची राज्य शासनाने क्रूर चेष्टाच चालविली आहे. दरवर्षी पुराशी गाठ पडणाऱया या ग्रामस्थ-शेतकऱयांचे प्रशासनासोबत स्थानिक आमदार व खासदारांना सोयरसुतक नाही, हे ग्रामस्थांना कळून चुकले आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी केली.
तेली हे कुडासे तसेच अन्य भागात पाहणी करण्यासाठी आले असता ते बोलत होते. दरम्यान तेली यांनी तातडीने प्रांताधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधत ग्रामस्थांना घेऊन येत्या बुधवारी खास बैठक लावण्याची सूचना केली.
दोडामार्ग तालुक्यात नुकत्याच उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तेली हे पूरबाधित गावांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, पं. स. सदस्य बाळा नाईक, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवामोर्चा तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्यासह राजू निंबाळकर, सूर्यकांत गवस, संजय विर्नोडकर, रमेश दळवी, प्रथमेश तेली, खोक्रल सरपंच दीपक गवस, सुनील गवस, विनायक गवस, सुरेंद्र सावंत, विलास सावंत, विलास शेटकर आदी उपस्थित होते.
कुडासेतील वानोशीवाडीमधील शेतकरी व ग्रामस्थांची तेली यांनी भेट घेतली असता तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. हातातोंडाशी आलेला घास तिलारी धरण प्रशासनाने हलगर्जीपणामुळे हिरावून घेण्यात आला आहे, असा आरोप शेतकऱयांनी यावेळी केला. शेती-बागायती तसेच घरांमध्ये पाणी घुसून झालेले प्रचंड नुकसान तेली यांना दाखविले. तेव्हा प्रशासनाला तसेच स्थानिक आमदाराला व खासदाराला येथील शेतकऱयांचे काहीही पडलेले नाही. हे सर्वांना कळून चुकले आहे, असे सांगत प्रांताधिकारी व दोडामार्ग तहसीलदार यांना लगेच फोन करत कुडासे येथे येत्या बुधवारी ग्रामस्थांसमवेत बैठक लावण्याची सूचना केली. त्या अनुषंगाने वानोशी मंडप येथे ही बैठक सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तेली यांनी त्यानंतर खोक्रल येथे जाऊन कै. सुनीता शांताराम गवस यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. सुनीता हिचे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन निधन झाले होते. या मुसळधार पावसात ठिकठिकाणी वाहून गेलेल्या पूल, मोऱया, रस्ते यांचीही पाहणी तेली यांनी केली. पिकुळे ते खोक्रल या गावांना जोडणारा पूल पुराच्या पाण्यामुळे बराच वाहून गेला. त्याची पाहणी तेली यांनी केली.