लॉकडाऊनला विरोधासाठी व्यापारी रस्त्यावर
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून सुरु असलेले प्रयत्न चांगलेच आहेत. कोरोना संसर्ग रोखलाच पाहिजे. मात्र, त्यासाठी राज्य शासनाने जो मिनी लॉकडाऊन लावला असून त्यामुळे सर्वांच्या अर्थचक्राची चाके थांबणार असून हा मिनी लॉकडाऊन म्हणजे मोगलाईचा प्रकार असल्याची टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.
जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. सोमवारी रात्री हा आदेश आल्यानंतर नेमके काय बंद व काय सुरु याबाबत नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मंगळवारी सकाळी याचे पडसाद साताऱयातील बाजारपेठेत उमटले.
राजवाडा, मोती चौक, खणआळी येथे व्यापारी संचारबंदी, जमावबंदीचा आदेश झुगारुन रस्त्यावर उतरले. व्यापाऱयांनी शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयास विरोध दर्शवला. व्यापाऱयांनी त्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्याने तिथे शाहूपुरी पोलीस ठाण्यास फौजफाटा तैनात करावा लागला. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी व्यापाऱयांना लॉकडाऊनबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
हा प्रकार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते स्वतः व्यापारी पेठेत दाखल झाले. यावेळी व्यापाऱयांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या भावना योग्य असल्याचे सांगत आमदार शिवेंद्रराजेंनी व्यापाऱयांना पाठिंबाही व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, कोरोना फक्त कापड दुकानांमधून वाढतो याबाबत काही संशोधन झालेले आहे का ? असा उलटप्रश्न करत राज्य शासनाचा मिनी लॉकडाऊन एक प्रकारची मोगालाई असल्याची टीका केली.
अत्यावश्यक दुकानात कोरोना जात नाही आणि तो इतर दुकानांमधून वास्तव्यास असतो असे काही आहे का ? शासन एकीकडे बांधकाम व्यवसाय सुरु ठेवण्यास नियम व अटीवर परवानगी देते तर दुसकीकडे बांधकाम साहित्याची दुकाने बंद ठेवते मग बांधकामे होणार कशी ? कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे मान्य आहे मात्र त्यासाठी अशा प्रकारे नियमावली करणे चुकीचे असल्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी सांगितले.
शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन ठेवा
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु अन कापड, सोने, चांदी व इतर दुकाने बंद हा कोणता न्याय आहे. एकतर आता गुढीपाडवा जवळ आलाय. त्यामुळे दुकानात व्यापाऱयांनी माल भरुन ठेवला आहे. तो विक्री नाही झाला तर त्यांना नुकसान होणार आहे. रात्री 8 वाजेपर्यंत राहूद्या त्यांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवू द्या. शनिवार व रविवारी पूर्ण लॉकडाऊन करा त्याला व्यापारी सहकार्य करतील. मात्र, दुकाने पूर्ण बंद ठेवण्याचे व्यापाऱयांना मान्य नसल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.