बार-रेस्टॉरंट पाच महिन्यानंतर खुले : शाळा-महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंद
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या ‘अनलॉक 4.0’ मार्गसूचीपाठोपाठ राज्य सरकारनेही ही मार्गसूची 1 सप्टेंबरपासून लागू केली आहे. सोमवारी राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास मुभा देण्यात आलेली नाही. मात्र, ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे पाच महिन्यांपासून बंद असणारे बार-रेस्टॉरंट, पब, क्लब सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शाळा-महाविद्यालये सुरू करण्यावरील निर्बंध हटविण्यात आलेले नाही. मात्र, ऑनलाईन शिक्षण आणि दूरशिक्षण देता येईल. तसेच नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाकरिता पालकांच्या संमतीने शाळेला भेट देता येणार आहे, असे अनलॉक 4.0 मार्गसूचीमध्ये उल्लेख करण्यात आले आहे. त्याकरिता शिक्षण खाते स्वतंत्रपणे आदेशपत्रक प्रसिद्ध करेल. याच दरम्यान, बेंगळूरमधील ‘नम्म मेट्रो रेल्वे’ 7 सप्टेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. तथापि, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, जलतरण तलाव सुरू करण्यास अद्याप मुभा देण्यात आलेली नाही. 21 सप्टेंबरनंतर या क्षेत्रांना परवानगी द्यावी का?, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील प्रदेशात जिल्हा प्रशासनांना लॉकडाऊन जारी करता येणार नाही, असेही मार्गसूचीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सभा-समारंभांनाही परवानगी, मात्र अटी
विवाह समारंभांना देखील परवानगी देण्यात आली असली तर 50 पेक्षा अधिक जणांना आमंत्रित करता येणार नाही. 20 सप्टेंबरनंतर 100 किंवा त्यापेक्षा अधिक कमी जणांना आमंत्रित करता येणार आहे. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम किंवा सभांना 21 सप्टेंबरनंतर परवानगी दिली जाणार आहे. येथे देखील मास्क, सामाजिक अंतर व इतर नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे. या ठिकाणी 100 पेक्षा कमी जणांची उपस्थिती रहावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
कोविड सुरक्षा नियमांचे पालन अनिवार्य
राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण अधिनियम-2005 नुसार जारी केलेले सुरक्षा नियम अधिकाऱयांना शिथिल करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे परवानगी दिलेल्या क्षेत्रांच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्कचा वापर व इतर सुरक्षेचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र आयुक्त, जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.
65 वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती आणि 10 वर्षाखालील मुलांना अत्यावशयक गरजा आणि आरोग्यविषयक गरज वगळता घरांमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहेत.
बार-रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के ग्राहकांना परवानगी
कोरोना नियंत्रणासाठी मागील पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेले बार आणि रेस्टॉरंट खुले करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सुरुवातीला केवळ वाईन शॉप आणि एमएसआयएल मद्य दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिल नव्हती. आता 1 सप्टेंबरपासून काही अटींवर त्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रामुख्याने 50 टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना आतमध्ये प्रवेश देऊ नये. अशी सूचना देखील करण्यात आली आहे.