अनेक वर्षांच्या मागणीला यश
प्रतिनिधी / सावंतवाडी:
राज्य शासनामार्फत यंदा 5 ते 12 नोव्हेंबरला पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. राज्य पक्षी संघटनेच्यावतीने गेली अनेक वर्षे पक्षी सप्ताह साजरा करण्याची मागणी होत होती. त्यासाठी संघटनेच्यावतीने 2017 पासून पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यंदा राज्य शासनाच्यावतीने पक्षी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पक्षी संघटनेच्या मागणीला अखेर यश आले आहे.
वन्यजीव अभ्यासक तथा साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा 5 नोव्हेंबर हा जन्मदिवस तर आंतरराष्ट्रीय पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांची 12 नोव्हेंबरला जयंती असल्याचे औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पक्षी सप्ताह साजरा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसा आदेश निर्गमित झाला आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. शासनस्तरावरून हा सप्ताह साजरा करण्याची मागणी होती. ती मान्य झाली आहे. यामुळे पक्षी संवर्धन आणि जनजागृती करण्यासाठी बळ मिळणार असल्याचे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे राज्य अध्यक्ष जयंत वडतकर यांनी तरुण भारतला सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्व विषद व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्य शासनाने त्यासाठी प्राणी, पक्षी, वृक्ष, फूल, फुलपाखरू, कांदळवन वृक्ष अशी मानचिन्हे घोषित केली आहेत. पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. जगभरातील पक्ष्यांची जैवविविधता झपाटय़ाने कमी होत आहे. अनेक प्रजाती दुर्मीळ होत आहेत. राज्यातील प्रत्येक पक्षाचे महत्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याच्या संरक्षणाप्रती जबाबदारी स्पष्ट होण्यासाठी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षीप्रेमी संघटनांकडून आणि राज्य वन्यजीव मंडळांच्या सदस्यांकडून पक्षी सप्ताह साजरा करण्याची मागणी होत होती. त्या अंतर्गत 5 ते 12 नोव्हेंबर पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला.