प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्य सरकारी कर्मचाऱयांना खूशखबर दिली आहे. 1 जानेवारीपासून लागू होईल, याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱयांचा महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे. मूळ वेतनाच्या 2.75 टक्के भत्तावाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मागील आठवडय़ात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 3 टक्के इतक्या प्रमाणात वाढविला होता. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनेही आपल्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून 2.75 टक्के भत्तावाढीचा निर्णय घेतल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. या निर्णयामुळे सरकारला वार्षिक 1,447 कोटी रुपयांचा अधिक खर्च करावा लागणार आहे. महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी एकदा वाढविण्यात येतो. हा भत्ता जानेवारी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून लागू केला जातो.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या वेतनवाढीसाठी सातवा वेतन आयोग नेमून केंद्र सरकारी कर्मचाऱयांच्या समांतर वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. यापाठोपाठ महागाई भत्त्यात वाढ करण्यात आल्याने राज्य सरकारी कर्मचाऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे. भत्तावाढीच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी आभार मानले आहेत.