चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने रासायनिक खते विरहित शेतीचा अभ्यास करणार
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारने नैसर्गिक शेतीवर भर दिला असून या अंतर्गत राज्यातील चार कृषी विद्यापीठांना संलग्न असणाऱया कृषी विज्ञान केंदातील प्रत्येकी 1 हजार असे एकूण 4 हजार एकर जमिनीवर रासायनिक खते व कीटकनाशक न वापरता पिके घेण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.
अलिकडे सेंद्रिय भाज्या आणि फळांना मागणी वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळय़ापूर्वी बेंगळूर, धारवाड, रायचूर व शिमोगा या चार कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने रासायनिक खते विरहित शेतीचा अभ्यास हाती घेण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास व उत्पादन भरघोस आल्यास शेतकऱयांना या पद्धतीची शेती शिकविली जाणार आहे.
उपरोक्त विद्यापीठांच्या आवारात भरपूर जमीन असून त्यातील 1 हजार एकर जमिनीवर हा प्रयोग केला जाईल. प्रत्येक प्रदेशातील हवामान व पाण्याची उपलब्धता यानुसार वेगवेगळी पिके घेतली जातील.
कडुलिंब, शेणखताचा वापर करणार
रासायनिक खते व कीटकनाशक या ऐवजी हिरवी पाने, कडुलिंब, शेणखत यांचा वापर शेतीसाठी केला जाईल. एप्रिल व मे पूर्वी म्हणजेच मान्सूनपूर्वी लागवड केली आणि हा प्रयोग यशस्वी झाला तर त्या-त्या भागातील शेतकऱयांना नैसर्गिक शेती करण्यास सांगण्यात येणार आहे, असे कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी सांगितले.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती केंद्राचे संचालक व वैज्ञानिक श्रीनिवास रेड्डी यांच्या मते हजारो वर्षांपासून भारतीय आपल्या बुद्धीचा वापर करून नैसर्गिक शेती करत आहेत. रासायनिक खतामुळे मातीचा पोत टिकविण्यासाठी जे कृमी वनस्पती व जीवजंतू आवश्यक आहेत ते नष्ट होतात. उलट नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता परत येऊ शकते व उत्पादन वाढू शकते. यासाठी हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.