ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला, या व्यक्तव्याचा पुनरुच्चार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुन्हा एकदा टीका केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणयचे असेल तर एकच पर्याय होता. तो म्हणजे जातीयवाद वाढवणे, म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ निघतोय.
यावेळी राज ठाकरेंसह रोहित पवार यांनी आणखी एक ट्विट करत भाजपावर देखील निशाना साधला आहे. राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळे उडालेली धूळ डोळय़ात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच, अनेक अडचणी असताना सर्व मंत्री व प्रशासनाच्या सोबतीने चांगले काम सुरू असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रियतेत देशात टॉप 5 मध्ये तर देशात 13 राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपचा एकही मुख्यमंत्री टॉप 5 मध्ये नाही. टॉप 10 मध्ये आहेत तेही फक्त दोघेजण, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.
दरम्यान, पुण्याच्या दौऱयावर असताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. आधी प्रत्येकाला जातीबद्दल अभिमान वाटायचा, ’राष्ट्रवादी’च्या स्थापनेनंतर इतर जातींचा द्वेष करणे सुरू झाले, हे सर्वांना माहीत आहे. मी केवळ बोललो. 20 वर्षांमध्ये शाळा, कॉलेज, मित्रांमध्ये जाती आल्या. आपल्याला उत्तर प्रदेशप्रमाणे जातीचा महाराष्ट्र करायचा आहे का,’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.