मुंबई प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले असले तरीही आंदोलन अजून सुरूच आहे.इतकच नाही तर मुंबईत आझाद मैदानावर एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने जमले आहेत.
हा संप आणखी वाढू नये यासाठी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदनाद्वारे संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एका मंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसमोर एक अट ठेवली आहे.
भेटीच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट आहे असं आवाहन केले. यावेळी ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या.१ लाख कुटुंबाचं प्रतिनिधीत्व मी करतोय. दिवाळी झाली आमच्या कुटुंबीयांचं काय झालं? आज ३७ आत्महत्या झाल्या उद्या ३७० होतील. महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा इतकी सोपी मागणी आहे. हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मार्गी लावा अशी मागणी शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे केली.
या संपाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारशी संवाद साधणार आहे. सरकारसोबत माझं बोलणं झालं तर त्यापुढे काय करायचं हे कर्मचाऱ्यांना सांगेन. आत्महत्या करु नका. आत्महत्या हा उपाय नाही. मनगटात बळ ठेऊन आपल्याला लढाई लढायची आहे. डाव अर्धवट सोडून जायचं नाही. मनसे कामगारांच्या पाठिशी आहे असं आश्वासन राज ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना दिले आहे .