बेंगळूर पासून मिरजेपर्यंत धावण्याची शक्यताः प्रवाशांच्या अल्पप्रतिसादामुळे रेल्वेबोर्ड निर्णयाप्रत
प्रतिनिधी / कोल्हापूर
बेंगळूर ते कोल्हापूर मार्गावर धावणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस यापुढे बेंगळूर ते मिरजपर्यंतच सुरू ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. कोल्हापुरातील प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद अल्प असल्याने यापुढे कोल्हापूरऐवजी मिरजेपर्यंतच रेल्वे सुरू ठेवण्याच्या निर्णयापर्यंत रेल्वे बोर्ड आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत अधिकृत घोषणा मात्र झाली नसली तरी ती लवकरच होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, हा निर्णय झाला तर कोल्हापुरातून धावणार्या रेल्वेची संख्या घटणार असून बेंगळूरला जाणार्या प्रवाशांनाही मिरजेत जावे लागणार आहे.
कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आग्रही मागणी आणि पाठपुराव्यानंतर राम नाईक रेल्वे मंत्री असताना बेंगळूर ते मिरजेपर्यंत धावणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस कोल्हापूरपर्यंत आणण्यास मंजुरी मिळाली होती. त्यामुळे 795 किलोमीटरवरील बेंगळूर कोल्हापूरला जोडले गेले होते. राणी चन्नम्मा एक्सप्रेस दररोज बेंगळूरहून निघते. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू टर्मिनसवर दाखल होते. त्याच दिवशी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पुन्हा बेंगळूरला मार्गस्थ होते. कोल्हापुरातून बेंगळूरला जाणार्या प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी, व्यापार्यांसाठी ही रेल्वे महत्वाची आहे. त्याचबरोबर मिरज पर्यंतचा प्रवास करणार्या कोल्हापूरच्या प्रवाशांसाठी या एक्स्प्रेसचा आधार आहे. मात्र आता ही रेल्वे कायम स्वरुपी रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने कोल्हापूरातून बेंगळूरपर्यंत प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवाशांना मिरज जंक्शनपर्यंत प्रवास करुन तेथून राणी चन्नम्मा एक्स्प्रेसमधून बेंगळूरुपर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे.
चांगला प्रतिसाद असूनही रेल्वे बंदचा घाट : शिवनाथ बियाणी
राणी चन्नम्मा एक्स्प्रेसमधून कोल्हापूर ते मिरज पर्यंतचा प्रवास करणार्यांची संख्या जास्त आहे. दिवसाला सुमारे 200 ते 250 प्रवाशांची ये-जा होते. तर कोल्हापूरातून बेंगलुरुपर्यंतचा प्रवास करणार्या प्रवाशांची संख्याही चांगली आहे. त्यामध्ये व्यापार्यांबरोबर दक्षिण भारतात पर्यटनासाठी, धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी जाणार्या प्रवाशांचा समावेश आहे. पण रेल्वेच्या म्हणण्यानुसार बेंगळूरला जाणार्या प्रवाशांची संख्या दररोज सरासरी वीस इतकी आहे. त्यामुळे अल्पप्रतिसादाचा शिक्का मारून ही रेल्वे बंद करण्यात तर येत नाही ना? असा प्रश्न मध्य रेल्वे पुणे डिव्हिजनच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी उपस्थित केला. कोरोनामुळे गेली सहा महिने इतर रेल्वेप्रमाणे ही रेल्वे देखील बंद आहे.
कोल्हापुरातून राणी चन्नम्माचा प्रवास असा…
कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज जंक्शनमधुन बेळगांव, हुबळी, अरसिकेरे, तुमकुरु, दावणगेरे मार्गे 795 किमीचा टप्पा पार करत 21 डब्यांची राणी चन्नम्मा एक्सप्रेस बेंगलुरु रेल्वे स्थानकामध्ये दाखल होते. या मार्गावर 27 रेल्वेस्थानक आहेत. कोल्हापूर ते बेंगळूर अंतर पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला 16 तास 25 मिनिटांचा कालावधी लागतो.
स्थानिक खासदारांनी लक्ष घालण्याची गरज
राणी चन्नम्मा एक्स्प्रेस जर कोल्हापुरातून धावणे बंद झाले तर त्याचा कोल्हापूरच्या पर्यटनावरही दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती, संजय मंडलिक, धैर्यशिल या तीन खासदारांनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.