रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे संगोळ्ळी रायण्णा चौकात वाहतूक कोंडी
प्रतिनिधी / बेळगाव
संगोळ्ळी रायण्णा चौक ते अशोक चौकपर्यंत रस्त्याच्या दुसऱया बाजूचे काँक्रिटीकरण दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून आरटीओ कार्यालयासमोरील अडचणींमुळे वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहनांच्या रांगा राणी चन्नम्मा चौकापर्यंत लागत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. संगोळ्ळी रायण्णा चौक ते अशोक चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले नव्हते. सदर काम महिन्याभरापासून सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत होते. याकरिता सदर रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरू
होती.
हे काम पूर्ण झाल्याने आता दुसऱया बाजूच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला दोन दिवसांपासून प्रारंभ करण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीडी घालण्यात येत आहेत. काँक्रिटीकरण सुरू आहे. त्याकरिता एका बाजूने वाहतूक सुरू आहे. पण आरटीओ कार्यालयासमोर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांची गैरसोय वाढली आहे.
संगोळ्ळी रायण्णा रोडने तसेच एसपी ऑफीस कार्यालयाकडून येणाऱया वाहनांची गर्दी संगोळ्ळी रायण्णा चौकात होत आहे. परिवहन मंडळाच्या बसची वाहतूक जुना धारवाड रोडने सुरू आहे. पण हा रस्तादेखील नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. सकाळच्या सत्रात वाहनांची संख्या जास्त असल्याने संगोळ्ळी रायण्णा चौकात वाहतूक कोंडी होत आहे. सदर वाहतूक कोंडीमुळे राणी चन्नम्मा चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी निवारणासाठी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण वाहनांच्या संख्येपुढे रहदारी पोलीसदेखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक एसपी ऑफीस कार्यालयमार्गे वळविण्याची गरज आहे.
सर्किट हाऊसजवळ वाहतूक कोंडी
शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्त्यांवर असलेल्या अर्धवट कामांमुळे वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे या वाहतूक कोंडीत वाहनधारकांचा श्वास घुसमटत आहे.
सम्राट अशोक चौक ते सर्किट हाऊसपर्यंतच्या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. बस, मालवाहू वाहने, रिक्षा व दुचाकीधारकांच्या रांगा लागत आहेत. या रस्त्यावर बससह इतर वाहनांची संख्या अधिक आहे. शहरात प्रवेश करणारी वाहनेदेखील याच मार्गावरून धावतात. त्यातच या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. दुसरीकडे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
कामे जलदगतीने करून रस्ते वाहतुकीस खुले करा
शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे संथगतीने सुरू असल्याने फटका वाहनधारकांना व पादचाऱयांना बसत आहे. काही रस्त्यांवर विकासकामे सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. अशा रस्त्यांवर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मार्ट रस्त्यांची कामे जलदगतीने करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणी होत आहे.