बेळगाव / प्रतिनिधी
राणी चन्नम्मा विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर आणि एमबीए परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. परिवहन कर्मचाऱयांचा बेमुदत संप अद्यापही मिटला नसल्याने तो केव्हा मिटेल याची शाश्वती नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आले असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी 7 एप्रिलपासून परिवहन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पहिल्या दिवशीचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. परंतु संप सुरूच राहिल्याने रोज परीक्षा पुढे ढकलावी लागत होती. अद्यापही संप मिटलेला नसल्याने पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून नवीन वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमधून संताप
आधीच कोरानामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यांना काही दिवस ऑफलाईन तर काही दिवस ऑनलाईन शिक्षण घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत आहे. परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी तयारी केली आहे. परंतु बस कर्मचारी संपामुळे त्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.