ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याला मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आलेली नोटीस अचानक मागे घेण्यात आली आहे. ही नोटीस अचानक मागे का घेण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राणे यांच्या अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम 15 दिवसात हटविण्याचे आदेश मुंबई पालिकेने राणेंना दिले होते. दरम्यान, राणेंनी या बंगल्यावरील हातोडा टाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे. हायकोर्टाने तुर्तास राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. राणे यांनी आपलं बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडं जो अर्ज केला आहे, त्यावर कायदेशीररित्या पालिकेनं सुनावणी घेऊन निकाल देणं बंधनकारक आहे. ती सुनावणी घेऊन त्यांनी तातडीनं निकाल द्यावा आणि हा निकालही नारायण राणेंच्या विरोधात गेला तर त्यावर तीन आठवडय़ांपर्यंत कुठलीही कारवाई करु नये, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेकडून अधिश बंगल्याला बजावण्यात आलेली नोटीस अचानक मागे घेण्यात आली आहे. ही नोटीस मागे का घेण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, या बंगल्यावर कारवाईसाठी नव्याने पावले उचलली जातील, अशी माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली आहे.