प्रतिनिधी/ बेळगाव
शासनाने विकेंड कर्फ्यू पाठोपाठ नाईट कर्फ्यूदेखील मागे घेतला आहे. त्याबरोबरच पर्यटनस्थळे आणि मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विविध मार्गांवर धावणाऱया वातानुकूलित बससेवेलादेखील प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तामिळनाडू, तिरुपती, म्हैसूर-बेंगळूर आदी ठिकाणी धावणाऱया बसेसना प्रतिसाद वाढत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज हैदराबाद, तिरुपती, बेंगळूर, म्हैसूर, नाशिक, मुंबई, पुणे आदी मार्गांवर वातानुकूलित बस धावत आहेत. नाईट कर्फ्यू रद्द केल्याने रात्रीच्या प्रवासासाठी धावणाऱया एसी बस सुसाट धावत आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षात सार्वजनिक बस वाहतुकीबरोबर वातानुकूलित बससेवेवरदेखील परिणाम झाला होता. मात्र आता राज्यांतर्गत बससेवेबरोबर वातानुकूलित बस गोवा आणि महाराष्ट्र राज्यातदेखील धावत आहेत.
पर्यटनस्थळे आणि मंदिरे खुली करण्यात आल्याने तिरुपती बालाजी, म्हैसूर आणि बेंगळूर शहराकडे जाणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. दरम्यान लांबपल्ल्यासाठी प्रवासी रात्रीच्या प्रवासाला पसंती देतात. त्यामुळे एसी बसना प्रतिसाद वाढत आहे. विविध मार्गांवर धावणाऱया एसी बस रात्रीचा प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने बुकिंगसाठी ऍपची निर्मिती केली आहे. हे ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घर बसल्या बुकिंग करता येते किंवा www.ksrtc.in. या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करता येते.
प्रतिक्रिया
प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढतोय
-नितीन गडाद ( डेपो मॅनेजर)
नाईट कर्फ्यू रद्द झाल्याने विविध मार्गांवर रात्रीच्या प्रवासासाठी वातानुकूलित आराम बस धावत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. पर्यटनस्थळे आणि मंदिरेदेखील खुली झाली आहेत. त्यामुळे तिरुपतीला दररोज एक एसी बस धावत आहे. याबरोबरच इतर ठिकाणी आराम बस धावत आहेत.