वरुण गांधींनी साधला मोदी-योगींवर निशाणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाचे पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू आणि निवडणूक रॅली लावण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रात्री कर्फ्यू लावणे आणि दिवसा लाखो लोकांना प्रचारसभेत बोलावणे हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे म्हणजेच समजण्यापलीकडचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षातील बडय़ा नेत्यांच्या सभांमधील गर्दीबाबत त्यांनी केलेल्या या वक्तव्यातून पुन्हा एकदा परखड भूमिका मांडली आहे. यापूर्वी कृषी कायद्याच्या मुद्यावरून आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या समर्थनार्थही त्यांनी भूमिका मांडली होती.
‘रात्री कर्फ्यू लादणे आणि दिवसा लाखो लोकांना रॅलीत बोलावणे हे सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे आहे’ असे ट्विट वरुण गांधी यांनी सोमवारी केले. उत्तर प्रदेशातील मर्यादित आरोग्य यंत्रणा आहे. असे असताना ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्याला अधिक महत्त्व द्यायचे की निवडणुकीत ताकद दाखवण्याला प्राधान्य द्यायचे हे प्रामाणिकपणे ठरवावे लागेल, असेही वरुण गांधी म्हणाले.
गर्दी वाढल्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती सर्वाधिक असतानाही सभांमध्ये हजारो लोकांची गर्दी जमवली जाते. कोरोनाच्या निर्बंधातही नियमावली पायदळी तुडवत सभा घेतल्या जातात. त्या तुलनेत रात्रीच्यावेळी रस्त्यावर कमी लोक असल्यामुळे कोरोना पसरण्याची भीतीही कमी असते. तरीही नाईट कर्फ्यूसारखे निर्बंध विनाकारण लावले जातात असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे.
देशाच्या विविध राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवार, 25 डिसेंबरपासून राज्यव्यापी नाईट कोरोना कर्फ्यू लागू केला आहे. राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या जनविश्वास यात्रेच्या जाहीर सभांना गर्दी होत असून राज्यातील विविध भागात पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपने नुकतीच राज्यातील सहा भागातून जनविश्वास यात्रा सुरू केली असून, ही यात्रा राज्यातील सर्व 403 विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. वरुण गांधींच्या ट्विटमुळे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.