27 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ
पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा दावा
राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई / प्रतिनिधी
मुंबईतील रात्र जीवनाची (नाईट लाईफ) संकल्पना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या गळी उतरविण्यात शिवसेना नेते तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी यशस्वी झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबईतील नाईट लाईफ म्हणजे मुंबई चोवीस तास या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार, येत्या 27 जानेवारीपासून मुंबईत अनिवासी भागातील मॉल्स, हॉटेल आणि दुकाने चोवीस तास उघडी राहणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने नाईट लाईफ संकल्पनेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन योजनेची माहिती दिली. नाईट लाईफमध्ये पब आणि बारचा समावेश नाही. त्यामुळे पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही ताण येणार नाही. नाईट लाईफमुळे पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल. या योजनेला नाईट लाईफ नव्हे तर मुंबई 24 तास म्हणा, असे ठाकरे म्हणाले.
राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. मात्र, भाजपने ही संकल्पना धुडकावून लावली होती. आता पर्यटन खात्याची धुरा सांभाळत असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाईट लाईफचा प्रस्ताव आयत्यावेळी आणून त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घेतली.
नाईट लाईफमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. कारण, दुकाने रात्री दीड वाजता बंद झाली की नाही हे तपासण्याचा पोलिसांचा त्रास वाचणार आहे. पब आणि बार 24 तास उघडे राहणार नाहीत. ते नियमानुसार रात्री दीड वाजता बंद होणार. आता रात्रीच्यावेळी चित्रपट पहायचा असेल तर तो सुध्दा पाहता येईल. पहिल्या टप्प्यात अनिवासी भागात म्हणजे नरिमन पॉईंट, बीकेसी येथे राबविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पुण्यात आफ्टरनून लाईफ!
नाईट लाईफ केवळ मुंबईतच सुरू होणार की पुण्यासारख्या मोठय़ा शहरात सुरू करणार? याविषयी विचारले असता आदित्य यांनी मिश्किलपणे पुण्यात आफ्टरनून लाईफ सुरू करण्याचा विचार करतोय असे सांगितले. पुण्यात दुपारी 1 ते 4 या वेळेत दुकाने बंद असतात याबद्दल त्यांनी टोला लगावला.
पॉईटर्स
रात्रीची मुंबई
पहिल्या टप्प्यात अनिवासी भागात नाईट लाईफ सुरू होणार
नरिमन पॉईंट, बीकेसीतील मॉल्स, हॉटेल 24 तास खुली राहणार
नाईट लाईफमध्ये मुंबईतील पब आणि बारचा समावेश नाही
‘भाजपच्या सर्व गोष्टी युवकांच्या विरोधात आहेत. आधी नोटाबंदी केली त्यामुळे रोजगार गेले. भाजपला विद्यापीठात सुध्दा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिसतो. आमचा प्रयत्न रोजगार वाढीसाठी आहे’
आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री
‘राज्य सरकारने घेतलेला नाईट लाईफचा निर्णय नाईट लाईफ नसून तो मुंबईकरांसाठी किलिंग लाईफचा आहे. कमला मिलमधील एफएसआय घोटाळय़ाला पर्यटनाच्या नावाखाली नियमित करण्याचा हा डाव आहे’
आशिष शेलार
आमदार, भाजप