जीवनावश्यक सेवा सुरु राहणार : पेट्रोल पंप, औषधालये, भाजीपाला, भुसारी व अत्यावश्यक सेवा संचारबंदी केवळ 30 एप्रिलपर्यंत
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाचे थैमान – मृत्यूचे तांडव सुरु झाल्यानंतर आता सरकारला जाग आली असून 30 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात पेट्रोल पंप, औषधालये व अत्यावश्यक सेवा चालू रहाणार असून लॉकडाऊन होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
पालिका निवडणूक ठरल्याप्रमाणे होणार असून दहावी- बारावी परीक्षा मात्र पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत नवीन निर्णय, निर्बंध जाहीर केले. 30 एप्रिलपर्यंत त्याची कार्यवाही होणार असून त्यानंतर कोरोनाची वस्तुस्थिती पाहून पुढील निर्णय करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कॅसिनो, बार, मसाज पार्लर, सिनेमा, बस 50 टक्के सुरु
डॉ. सावंत पुढे म्हणाले की कॅसिनो, बार, रेस्टॉरंट, जिम, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, बस, रिव्हर प्रुझ, स्पा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स हे सर्व 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्था, स्विमिंगपूल, मेळावे, सभा, बैठका पूर्णतः बंद
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास, स्विमिंग पूल हे सर्व पूर्णपणे बंद ठेवावे. सांस्कृतिक, क्रिडास्पर्धा मेळावे, राजकीय सभा, बैठका यांना बंदी घालण्यात आली आहे. तर सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम- मेळावे यांनाही मनाई करण्यात आली आहे.
कारखाने, व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू राहणार
अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना अनुमती देण्यात आली असून विवाह सोहळ्यात 50 टक्के हॉल क्षमतेच्या लोकांना परवानगी आहे. उद्योग- कारखाने- धंदे व्यवसाय यावर कोणतीच बंधने नाहीत तर ते नेहमीप्रमाणे चालू रहातील, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
लॉकडाऊन होणार नाही
लॉकडाऊन होणार नसल्याने लोकांनी घाई – गडबड करुन बाजारात मोठय़ा खरेदीसाठी गर्दी करु नये. सर्व अत्यावश्यक सामानाची दुकाने नहेमीप्रमाणे चालू ठेवण्याची अनुमती देण्यात आली असून तेथे लोकांना नियमितपणे समान उपलब्ध होणार आहे. तेव्हा जनतेने लॉकडाऊनची भिती बाळगू नये व त्या भितीने आठवडाभराची – महिन्याची खरेदी करु नये, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.रुग्ण वाढल्यास कंटेनमेंट झोन होईल, पण सेवा सुरु राहतील
एखाद्या गावात- वाडय़ात, वॉर्डात- इमारतीत किंवा वसाहतीत कोरोनाचे रुग्ण बेसुमार वाढले तर तेथे मायक्रो- कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येईल तथापि तेथील अत्यावश्यक सेवा- दुकाने हे सर्व चालू ठेवण्यात येणार आहे. त्यावर बंदी घालण्यात येणार नसल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
सरकारी खाती – त्यांच्या प्रमुखांना तेथील कर्मचाऱयांना गरजेनुसार काही प्रमाणात घरुन काम करण्याची मुभा देण्यात आली असून खाती- तेथील कार्यालये पूर्ण क्षमतेने चालू ठेवली जाणार आहेत. ती बंद केली जाणार नाहीत. प्रमुख सरकारी इस्पितळांना जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले जातील. तेथे फोन करुन रुग्णांची चौकशी नातेवाईकांना करता येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.