लोगोसाठी घेतली वनविभाने स्पर्धा, शेकडो लोगोतून निवडणार योग्य लोगो
प्रतिनिधी / सरवडे
महाराष्ट्रात सर्वप्रथम स्थापित झालेल्या व जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या राधानगरी (दाजीपूर ) अभयारण्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी लोगो निर्धारित करण्यात येणार आहे. अभयारण्याचा लोगो निर्माण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या १०० लोगोंचे हिरटेज कमिटी व तज्ज्ञांकडून मूल्यांकन करण्यात येणार असून त्यातून योग्य लोगो निवडला जाणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राखीव ठेवलेले दाजीपूर अभयारण्य आज जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. हे अभयारण्य पर्यटक व अभ्यासकांचे कोल्हापुरातील पर्यटनाचे आवडते स्थान बनले आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून असंख्य पर्यटक या अभयारण्याला भेट देत आहेत. अभयारण्यातील विविध जंगली, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, कीटक तसेच औषधी वनस्पती व घनदाट झाडीने बहरलेले जंगल पर्यटकांच्यामध्ये ओढ निर्माण करत आहे. पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी विविध योजना व सेवा सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या अभयारण्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी लोगो तयार करण्या च्या दृष्टीने वन्यजीव विभागाने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात लोगो स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून शंभरपेक्षा अधिक कलाकारांनी लोगो तयार केले आहेत. त्यामध्ये डिझायनिंगची कला उत्तमपणे वापरून जंगल, वन्यजीव गोवा, शेकरू, फुलपाखरू व व राजश्री शाहू महाराजांची प्रतिमा यांचा समावेश केला आहे. प्राप्त झालेल्या लोगोंचे हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष अमरजा निंबाळकर, पर्यावरण तज्ञ जय सामंत, रोकडे, कला विशेषज्ञ अजय दळवी, रमण कुलकर्णी, पर्यावरण तज्ञ संजय करकरे यांच्याकडून मूल्यांकन केले जाणार आहे.
लोगोंचे प्रदर्शन
स्पर्धेत सहभागी झालेल्या लोगोंचे २५ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे प्रदर्शन भरवण्यात येणार असून प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन २९ जानेवारी पर्यंत सुरु ठेवण्यात येणार असून याचा निसर्गप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय वनाधिकारी वि.ह. माळी यांनी केले आहे.